जळगाव – पंतप्रधान एकाच आठवड्यात दोनवेळा राज्याच्या दौऱ्यावर आले. यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली. याला उत्तर देत भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. महाजन म्हणाले की, ठाकरेंनी राज्यभर फिरून किमान लोकसभेची एकतरी जागा जिंकून दाखवावी, असे आव्हान महाजनांनी ठाकरेंना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातच दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निर्मितीसाठीच मोदी वारंवार राज्यात येत असल्याची टीका विरोधकांनी केली. भाजपला लोकसभेत फटका बसणार असल्याचे सर्व्हे प्रसिद्ध झाले होते. त्यामुळेच मोदींचा सोलापूर दौरा होत असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे.
राज्यात भाजपकडे दमदार नेतृत्व शिल्लक राहिलेले नसल्याने मोदींना वारंवार दौरे करावे लागत आहेत. तसेच, आता निवडणुका जवळ आल्याने मोदींना महाराष्ट्राची चिंता वाटू लागली आहे, असे माध्यमांशी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदींनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींचा धसका घेतला आहे. यातूनच मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. जिथे राजकीय फायदा दिसतो तिथेच मोदी जातात. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा असल्यानेच ते एकदाही तिकडे गेले नाहीत, असा थेट आरोप राऊतांनी केला.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८०, त्यानंतर महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. त्यामुळे या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोळा आहे. त्यांनी मणिपूरला, काश्मीर खोऱ्यात, म्यानमारच्या सीमेवर, लडाखला जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन मालदिवशी भांडण करून राजकारण केले, अशी टीकाही राऊतांनी केली आहे.
मोदी जगमान्य नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगमान्य नेते आहेत. त्यामुळेच संजय राऊतांच्या पोटात शूळ उठत आहे. आता राऊतांनी आपले नेते उद्धव ठाकरे यांना घेऊन देशभर फिरावे. किमान राज्यभर फिरवून लोकसभेची एक जागा निवडून दाखवावी.
निवडणुका जिंकायच्या असतील, तर राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी. त्यांनी आपल्या नेत्यांना लोकांमध्ये घेऊन जावे. त्यानंतरच त्यांना कळेल की, त्यांच्या पाठीशी किती जनता आहे, असा टोलाही महाजनांनी राऊतांना लगावला आहे.