मुंबई : राज्यात घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेना (ठाकरे गटाचे) राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरु होणार आहे. आजपासून ते पुढच्या महिन्याच्या 3 तारखेदरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे.
शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. दरम्यान, 27 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असल्याने आमदारांचा या अभियानात समावेश नसल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानाला गेला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेत्यांनी लोकांमध्ये जाण्यासाठी बैठका, चर्चा आणि राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर भर देण्यात आला आहे.
शिवसेनेने या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे. तसेच पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानासाठी जिल्हावार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाखांची माहिती, पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहिती या अभियानाद्वारे घेतली जाणार आहे.