मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन आणि घोषणाबाजीदरम्यान धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात आता अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यावरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
लोकप्रतिनिधींकडून संयम पाळला गेला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना त्यावरून ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवरच आरोप केला आहे. “संयम पाळला गेलाच पाहिजे. पण तुम्ही जर फक्त विरोधकांकडून संयम पाळला जाण्याची अपेक्षा करत असाल, तर हे चुकीचं आहे. कारण सत्ताधाऱ्यांचेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. सभापतीही त्यांचेच आहेत. त्यामुळे अशा प्रकारे विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो निंदनीय आहे”, असे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, यावेळी सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरून देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “ज्या प्रकारे सत्ताबदल करण्याचा प्रयत्न केला गेला, आमदारांना पळवण्याचा प्रयत्न केला गेला, तो असंवैधानिक आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. आमची अपेक्षा न्यायव्यवस्थेकडून आहे. मात्र, तिथेही ‘जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड’ असे होत आहे. त्यामुळे जर विरोधक दबावगट करून सत्य बोलत असतील, तर सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे”, असे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.