नवी दिल्ली – भाजपशी थेट लढत असणाऱ्या लोकसभेच्या 200 जागांवर कॉंग्रेसने लक्ष केंद्रित करावे, असे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सुचवले आहे. त्या भूमिकेवरून कॉंग्रेस आणि राजद सोशल मीडियावरून एकमेकांना भिडले.
कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागात कार्यरत असणारे तरूण नेते सरल पटेल यांनी तेजस्वी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. कॉंग्रेसला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. तुमचा सल्ला तुमच्या जवळच ठेवा. कॉंग्रेसने काय करावे ते ठरवण्यासाठी पक्षाचे नेते सक्षम आहेत, असे ट्विट त्यांनी केले. त्याला राजदच्या सोशल मीडिया विभागातील नेते आकाश यांनी प्रत्युत्तर दिले.
मग्रुरीमुळे कॉंग्रेसला आता निवडणुकांमध्ये नोटा या पर्यायाशी लढा द्यावा लागत आहे, असे त्यांनी म्हटले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) कुठल्या उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास वरील पैकी कुणीच नाही (नोटा) असा पर्याय उपलब्ध असतो. त्याचा संदर्भ घेऊन राजदकडून कॉंग्रेसची खिल्ली उडवण्यात आली.
तेजस्वी यांनी एका मुलाखतीत पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची आघाडी उभी राहण्याला अनुकूलता दर्शवली. कॉंग्रेसने ठराविक जागांवर लक्ष केंद्रित करावे. इतर जागांवर ताकद असणाऱ्या प्रादेशिक पक्षांना संधी द्यावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.