अहमदाबाद – भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर व नवोदित वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या अफलातून गोलंदाजीच्या बळावर पाहुण्या वेस्ट इंडिजचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 धावांनी पराभव केला. या विजयासह यजमान भारतीय संघाने तीन सामन्यांची ही मालिका 2-0 अशा विजयी आघाडीसह खिशात टाकली. नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाच्या वाटचालीतील हा पहिलाच मालिका विजय ठरला आहे.
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या 238 धावांचा पाठलाग करताना एकवेळ वेस्ट इंडिजच्या शेमार ब्रुक्स, अकिल हुसेन व ओडेन स्मिथ यांनी जबरदस्त आक्रमक फलंदाजी केली मात्र, त्यांचा अनुभव कमी पडला व प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा डाव 46 व्या षटकांत 193 धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून कृष्णाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना शार्दुल ठाकूरने 2 गडी बाद केले. दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, महंमद सिराज व यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून तिसरा व अखेरचा सामना येत्या शुक्रवारी होणार आहे.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा नियमित कर्णधार कॅरन पोलार्डने दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतल्याने बदली कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय केमार रोश व ओडेन स्मिथ यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, बदली सलामीवीर ऋषभ पंत व विराट कोहली यांना बाद करत सार्थ ठरवला. त्यावेळी संघाची अवस्था 3 बाद 43 अशी बिकट बनली होती. त्याचवेळी संघात परतलेला नियमित सलामीवीर लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी नेटाने फलंदाजी केली. या जोडीने वेस्ट इंडिजच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व राखले व चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी केली.
राहुल भरात आलेला असताना अर्धशतक पूर्ण करण्याच मात्र, अपयशी ठरला. त्याने 48 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. तो बाद झाल्यावर सूर्यकुमारनेही आपले अर्धशतक साकार केले. त्याने वॉशिंग्टन सुंदरला हाताशी घेत संघाचे दीडशतक फलकावर लावले. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 83 चेंडूत 5 चौकार फटकावत 64 धावांवर बाद झाला. सुंदरही चांगला खेळत असताना 24 धावांवर बाद झाला.
शार्दुल ठाकूरने निराशा केली. त्याचवेळी दीपक हुडाला साथ देताना यजुवेंद्र चहलने 11 धावांची उपयुक्त खेळी केली. दीपकनेही चांगली खेळी केली मात्र, स्थिरावलेला असताना तो 29 धावांवर परतला. मात्र, त्याने संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. भारताचा डाव 50 षटकांत 9 बाद 237 धावांवर रोखला गेला. चहल 11 धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि ओडियन स्मिथ यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर केमार रोच, जेसन होल्डर, अकिल होसेन आणि फॅबियन एलन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. पहिला सामना जिंकून भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत 9 बाद 237 धावा. (सूर्यकुमार यादव 64, लोकेश राहुल 49, दीपक हुडा 29, वॉशिंग्टन सुंदर 24, विराट कोहली 18, ऋषभ पंत 18, यजुवेंद्र चहल नाबाद 11, ओडेन स्मिथ 2-29, अल्झारी जोसेफ 2-36, जेसन होल्डर 1-37, अकिल हुसेन 1-39, केमार रोश 1-42, फॅबियन ऍलन 1-50). वेस्ट इंडिज – 46 षटकांत सर्वबाद 193 धावा. (शेमार ब्रुक्स 44, अकिल हुसेन 34, शाय होप 27, ओडेन स्मिथ 24, प्रसिद्ध कृष्णा 4-12, शार्दुल ठाकूर 2-41).