INDW vs BANW 3rd T20I : बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी सुरू ठेवत तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर सलामीवीर शेफाली वर्माने अर्धशतक झळकावले. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत 117 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 18.3 षटकांत तीन विकेट गमावत 121 धावा करून सामना जिंकला. यंदा महिला टी-20 विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार आहे आणि त्यामुळे भारतीय संघाची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे.
For her opening act of 51(38), @TheShafaliVerma is adjudged the Player of the Match 👏👏#TeamIndia take an unassailable 3-0 lead in the series 🙌
Scorecard ▶️ https://t.co/AOX5d4Yotb#BANvIND pic.twitter.com/r7MlNhCPjz
— BCCI Women (@BCCIWomen) May 2, 2024
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करण्यास भारतीय गोलंदाजांना वेळ लागला नाही. बांगलादेशकडून सलामीवीर दिलारा अख्तरने 25 चेंडूत 39 धावा केल्या आणि कर्णधार निगार सुलतानाने 28 धावा केल्या, मात्र संघाला 20 षटकांत आठ गडी बाद 117 धावाच करता आल्या. यजमान संघाचे बहुतांश फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत आणि मोठी धावसंख्या उभारण्यात संघ मुकला.
राधाने 4 षटकात 22 धावा देत 2 बळी घेतले. तिच्याशिवाय रेणुका सिंगने 25 धावा देत 1 बळी घेतला. युवा अष्टपैलू श्रेयंका पाटीलनेही यश संपादन केले. दीप्ती शर्मा ही एकमेव गोलंदाज होती जिला एकही विकेट घेता आली नाही.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला शेफाली आणि स्मृती मानधना यांनी चांगली सुरुवात करून दिली आणि दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 59 धावा जोडल्या. शेफालीने 38 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या, तर स्मृती मानधनाने 42 चेंडूंत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 47 धावा केल्या. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 12.1 षटकात 91 धावांची भागीदारी केली. उर्वरित काम हरमनप्रीत कौर (6*) आणि ऋचा घोष (5*) यांनी केले.
भारताच्या विजयात शेफाली वर्माचा मोठा वाटा होता. शेफालीला तिच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. उभय संघांमधील मालिकेतील चौथा टी-20 सामना 6 मे रोजी सिल्हेत येथे खेळवला जाणार आहे.