नात्यालाही “बाधा’ : भीतीपोटी अंत्यविधीनंतरही आप्तेष्टांची पाठ
– सागर येवले
पुणे – करोनाची लागण झाल्यावर एकाकीपण तर नशिबी येतेच… पण, यातून मृत्यू ओढावला तर दशक्रिया विधीही नशिबी नसतो. संसर्गाच्या भीतीमुळे पोटची लेकरंही अंत्यविधीनंतर अस्थी नेण्यासाठी फिरकत नसल्याचे भीषण वास्तव पुढे येत आहे. या अस्थी सांभाळण्याचे ओझे सध्या पालिका कर्मचाऱ्यांना वाहावे लागत आहे. त्यामुळे करोनाची केवळ आर्थिकच नाही, तर मानवी नात्यांनाही बाधा झाल्याचे म्हणावे लागत आहे.
करोनामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात दि. 19 जूनपर्यंत तब्बल 552 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरात 487 बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बाधिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता पालिका प्रशासन त्या मृतदेहाला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून कैलास स्मशानभूमीत अंत्यविधी करते. मात्र, यानंतरही अस्थी नेण्यासाठी नातेवाईक फिरकत नसल्याचे दिसून येते. काही मोजक्या मृतांचे नातेवाईक अस्थी घेऊन गेल्याची माहिती पालिकेने दिली. शहरातील रुग्णालयांत पुण्यासह ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यांतील मृतांचाही समावेश आहे. त्यामुळे ही सर्व संख्या पाहिली, तर जवळपास 500 पेक्षा अधिक रुग्णांच्या अस्थी महापालिका सांभाळत आहे.
एखाद्याचा करोनामुळे मृत्यू झाल्यावर नातेवाईकांची “तपासणी परेड’ सुरू होते. महापालिका, पोलीस यांसह अन्य विभाग विचारपूस करतात. त्यामुळे नातेवाईक मेटाकुटीला येतात. मात्र, हे सर्व सुरक्षेसाठी सुरू असते. 14 दिवस क्वारंटाइन असल्यामुळे नातेवाईक बाहेर पडू शकत नाहीत. तर, त्यानंतरही आपल्याला संसर्ग होऊ नये, या भीतीपोटी नातेवाईक अस्थी घेण्यासाठी जात नसावेत. परंतु, महापालिकेने या सर्व अस्थी सुस्थितीत ठेवल्या आहेत. कोणी नातेवाईक आल्यानंतर त्यांना त्या देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.