नगर – जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून, नागरिकांचे ही सहकार्य महत्त्वाचे आहे. मात्र, काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरत असून, स्वत: बरोबरच इतरांच्याही आरोग्याला धोका पोचवत आहेत. अशा व्यक्तींवर कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. नागरगोजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, संदीप वालावलकर, सहायक पुरवठा अधिकारी सुनील सैंदाणे यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात 12 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. मे महिन्यानंतर जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले. त्यांच्या संपर्कात आल्याने बाधित झालेल्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
विनाकारण घराबाहेर पडू नका, अनावश्यक संपर्क टाळा, घरातील वयोवृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्या. जुलै आणि ऑगस्ट अखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड्सची संख्या, ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून, पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
गुन्हे दाखल करा
जिल्ह्यासाठी आता 2 हजार 660 मेट्रिक टन युरिया प्राप्त होणार आहे. तसेच जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, सोयाबीन आणि बाजरीची बियाणे उगवणीसंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांना बियाणे बदलून द्या. तसेच संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी दिले.