नवी दिल्ली – दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीनंतर मोदी शेतकऱ्यांचा नरसंहार करण्याचा कट आखत आहेत अशा अर्थाचा एक हॅशटॅग ट्विटरवर सुरू होता. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी आपल्या अकाउंटवरून हा हॅशटॅग वापरल्याने तो ट्रेंडिंग झाला होता. अशातच आता खोटा हॅशटॅग चालवण्याच्या प्रकाराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
हा हॅशटॅग आणि ज्या अकाउंटवरून हा हॅशटॅग चालवला गेला त्यावर कारवाई करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असा थेट इशारा देणारी नोटीस केंद्र सरकारने ट्विटरला बजावली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने ट्विटरला ही नोटीस बजावली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर ट्विटरवरून #ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नसतानाही हा हॅशटॅग वापरण्यात आला. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेऊन ट्विटरकडे तक्रार केली होती.
ट्विटरनेही केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर 250 ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा हे ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आले. ट्विटरच्या या निर्णयामुळे केंद्र सरकार भडकले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला फायनल नोटीस पाठवली असून त्यात संबंधित हॅशटॅग आणि अकाउंट ब्लॉक करण्याची सूचना केली आहे. जर ही कारवाई केली नाही तर ट्विटरवर कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्राने म्हटलं आहे.