दुबई – ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेआपला दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्यामुळे न्यूझीलंडचा आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश झाला आहे. आता अंतिम सामन्यातील दुसरा संघ कोण असेल यावर चर्चा सुरू झाली आहे. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या तीनही संघांना संधी आहे.
भारताने मायदेशात होत असलेल्या मालिकेत इंग्लंडचा निर्विवाद पराभव केला तर त्यांना अंतिम फेरी गाठण्यात यश येणार आहे. मात्र, हे गणित वाटते तितके सोपे नाही. भारतीय संघाला ही मालिका जिंकावी लागणार आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत सध्या भारत पहिल्या स्थानी, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला किमान दोन कसोटी सामने जिंकणे गरजेचे आहे. या मालिकेचा निकाल 4-0, 3-0, 3-1, 2-0, 2-1 यापैकी काहीही लागला तरी भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. या मालिकेचा निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला तरच इंग्लंडला संधी मिळेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द झाली असली तरी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. भारत व इंग्लंड कसोटी मालिका बरोबरीत सुटली किंवा अनिर्णित राहिली तर ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. तसेच जर भारत दोनपेक्षा जास्त कसोटी सामने हारला व इंग्लंडला तीनपेक्षा जास्त सामने जिंकता आले नाहीत तरीही ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत स्थान मिळेल.