मुंबई – बीसीसीआय व निवड समिती यांच्या डोकेदुखीत आता वाढ झाल्याचे समोर आले आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा व प्रमुख फलंदाज विराट कोहली यांनी यंदाच्या मोसमात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी संघ निवड करताना निवड समितीला मोठे खलबत करावे लागणार आहे. तसेच ज्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी प्रयोग म्हणून यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये खेळवले गेले त्यांची निवड करायची की नाही असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत असतान निवड समितीचे अध्यक्ष आजीत आगरकर यांच्यासह बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी व संघ व्यवस्थापन तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या दोन्ही खेळाडूंशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. या चर्चेदरम्यान या दोन्ही खेळाडूंनी येत्या जुन महिन्त वेस्ट इंडिज व अमेरिकेत होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवड समितीच दडपणाखाली आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी गेल्या काही मोसमांपासून टी-२० क्रिकेटच्या अनेक स्पर्धा तसेच सामन्यांमधून मिघारही घेतली होती तसेच काही वेळा बीसीसीआयकडे विश्रांतीही मागितली होती, त्यामुळे येत्या काळात हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय व कसोटी क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करतील असा ग्रह करत निवड समितीने अनेक नवोदितांना संघात संधी दिली. तसेच गेल्या दोन मोसमांपासून टी-२० सामन्यांमध्ये याच खेळाडूंना प्रयोग म्हणून रोटेशननूसार खेळवले देखील गेले आहे.
आता रोहित व कोहली टी-२० संघात परतल्यावर कोणत्या दोन खेळाडूंचा पत्ता कट होणार याकडे लक्ष राहणार आहे. सलामीला कर्णधार रोहित शर्माच असणार परंतू त्याच्या जोडीला शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, इशान किशन व ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी कोणत्या दोन खेळाडूंना संधी मिळणार हा प्रश्न आहे. संघात लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग कायम राहणार असले तरीही कोहली परतल्यावर रिंकूची जागा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच श्रेयस अय्यर देखील सातत्यपूर्ण खेळत असल्याने पाचव्या क्रमांकावर कोणाला खेळवायचे हा गहन प्रश्न निवड समितीसमोर निर्माण होणार आहे.
IND vs SA Test Series : दक्षिण आफ्रिकेत ‘अशी ‘कामगिरी करणारा भारत ठरला पहिला आशियाई संघ…
गोलंदाजीत रवींद्र जडेजा, अक्सर पटेल यांचे स्थान निश्चित मानले जात असले तरीही वेगवान गोलंदाजीत अनेक पर्याय समोर आले आहेत. महंसद सिराज, महंमद शमी, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित मानले जात आहे कारण स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये व अमेरिकेत होत असल्याने फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांवरच जास्त भर राहील हे उघड आहे. मात्र, या स्पर्धेसाठी १५ किंवा १६ खेळाडूंची निवड करताना निवड समितीची तारांबळ उडणार आहे हे मात्र स्पष्ट होत आहे.
द्रविड काय निर्णय घेणार
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपर्यंतच करार वाढवण्यास उत्सूक होते. त्यानंतर ते हा करार टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत वाढवणार का हा प्रश्न आहे. अद्याप बीसीसीआय व द्रविड यांच्यात याबाबत चर्चा झालेली नसल्याने लवकरच याचा उलगडा केला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द द्रविड यांनीच टी-२० स्प्रधेपर्यंत पदावर कायम राहण्याची तयारी दर्शवल्याचेही सांगण्यात आले होते.