सातारा – भरतगाव (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन शिक्षिकांमध्ये झालेल्या मारामारीची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेत त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केली.
भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका मनीषा भुजबळ व सौ. रंजना चौरे या दोन शिक्षकांमध्ये दि. 6 सप्टेंबर रोजी मारामारी झाली होती. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या होत्या. शिक्षक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली होती. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी ही घटना गांभीर्याने घेत सातारा पंचायत समिती स्तरावरुन तात्काळ अहवाल मागवला होता.
याबाबत शिक्षण विभागाकडून विनय गौडा यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला होता. भरतगाव शाळेत झालेल्या मारामारीच्या घटनेने भरतगावची आणि जिल्हा परिषदेचीही बदनामी झाली होती. याबाबत भरतगाव ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने दोन्ही शिक्षकांची बदली करा अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. दोन शिक्षिकांमध्ये शाळेतच झालेली मारामारीची घटना गंभीर असल्याने विनय गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे.
श्रीमती भुजबळ यांचे मुख्यालय आता कराड तर सौ. चोरे यांचे मुख्यालय आता खटाव असणार आहे. विनय गौडा यांच्या या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत दै. प्रभातने सर्व प्रथम वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेने ही कारवाई केली आहे.