पुरंदरमध्ये तीन वर्षांत शासकीय मदत रिती : शेतकऱ्यांना दिलासा
निखिल जगताप
बेलसर – पुरंदर तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मागील काही वर्षांपासून पुरंदर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. तीन वर्षांपासून तालुक्यामध्ये नऊ कोटी रुपये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वाटप केले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदतीची ओंजळ रिती केली आहे.
2019 आणि 2020 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि महापुराचा सामना शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे 9 कोटी 77 लाख 24 हजार 853 रुपये नुकसान भरपाई अनुदान प्रशासनामार्फत वितरित केल्याची माहिती तहसीलदार यांच्याकडून दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली असली तरी, झालेले नुकसान हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने भरून काढण्यासारखे नाही.पुरंदर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर 2019 दरम्यान 692 लाभार्थी शेतकऱ्यांना 79 लाख 24 हजार 600 रुपये अनुदान वाटप केले आहे. त्यामध्ये 148 लाभार्थी शेतकऱ्यांना 19 लाख 82 हजार रुपये मृत जनावरांना नुकसान भरपाई अनुदान वाटप केले आहे.
298 लाभार्थी शेतकऱ्यांना 23 लाख 22 हजार 600 रुपये पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई दिली आहे.तर 4 लाभार्थी शेतकऱ्यांना 12 लाख रुपये मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत म्हणून वितरित केले आहेत. 242 लाभार्थीना 24 लाख 20 हजार रुपये अनुदान वाटप केले आहे. (दि.25) सप्टेंबर 2019 च्या मध्यरात्री मोठा महापूर आला होता. त्या अनुषंगाने सप्टेंबर व ऑक्टोबर 2020 मध्ये 16 हजार 721 लाभार्थी शेतकऱ्यांना 8 कोटी 86 लाख 45 हजार अनुदान वितरित केले आहे.
हे तीन वर्षांतील सर्वाधिक अनुदान आहे. त्यामध्ये तीन लाभार्थ्यांना 36 हजार 500 रुपये जून व ऑक्टोबरमध्ये मृत जनावरांना भरपाई अनुदान वितरित केले होते. 117 लाभार्थींना 7 लाख 2 हजार रुपये घरांची भरपाई दिली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबरसाठी 16 हजार 200 लाभार्थींना भरपाई अनुदान 8 कोटी 63 लाख 42 हजार 703 रुपये वितरित केले आहे. हे अनुदान या वर्षातील सर्वाधिक आहे. तर 401 लाभार्थी शेतकऱ्यांना 15 लाख 64 हजार 50 रुपये इतक्या जमिनीची भरपाई अनुदान मिळाले आहे.
जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या 59 लाभार्थी शेतकऱ्यांना 11 लाखांची भरपाई अनुदान वितरित केली आहे. 29 लाभार्थींना 7 लाख 5 हजार रुपये घरांची पडझड झालेल्या भरपाई अनुदान व 39 लाभार्थींना 4 लाख रुपये पिकाचे नुकसान भरपाई दिली आहे.