मेणाहून मऊ आणि प्रसंगी वज्राहून कठोर असे रूप धारण करण्याची शक्ती स्त्रीमध्ये असते. सामर्थ्य, श्रद्धा, शील, संवेदनशीलता, सेवा, मातृत्व हे गुण अंगी बाळगून विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या अनेक महिला आपणास दिसतात. त्यातीलच एक मुक्या जीवांची वेदना जाणून त्यांना आजारातून बरी करणारी माऊली म्हणजे डॉ. प्रेरणा मुळूक-पवार.
भारत हा कृषिप्रधान देश असल्याने जगातील सर्वाधिक पशुधनदेखील आपल्याकडेच आहे. शिक्षणाच्या अनेक शाखा विस्तारत असताना आताशी कुठे पशुवैद्यकीय शाखा लोकांच्या नजरेत भरते आहे. ज्या शाखेला विकसित देशांत अतिशय सन्मानाने पाहिले जाते, त्याच शाखेला समाजात असलेल्या अज्ञानामुळे महाराष्ट्रात मात्र करिअर निवडताना दुय्यम स्थान दिले जायचे. पशुवैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण न झाल्याने या क्षेत्रात येण्यासाठी ग्रामीण व निमशहरी भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसते. हे क्षेत्र प्रामुख्याने पुरुषप्रधान असले तरी प्रसंगी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून पशुवैद्यक या वेगळ्या क्षेत्रात थोडक्या कालावधीतच आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या काही महिला आहेत ज्यांना आजच्या महिलादिनी सन्मानित करणे उचित ठरते.
डॉ. प्रेरणा मुळूक-पवार यांचे सासर व माहेर पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील असताना त्या कामाची खिंड मात्र अहमदनगर जिल्ह्यात लढवताना दिसतात. घरात लहानपणापासूनच हुशार असलेल्या डॉ. प्रेरणा यांच्या वडिलांची परिस्थिती जेमतेम; परंतु वडिलांचा मुलीबद्दल असलेला आत्मविश्वास तिला प्रगतीपथावर किती लांबवर घेऊन जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजेच डॉ. प्रेरणा होय. त्या सांगतात, या क्षेत्रात प्रवेशापासूनच खूप अडचणी येत होत्या. डॉ. प्रेरणा यांचे पशुवैद्यकीय पदवीचे शिक्षण हे सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात झाले. पदव्युत्तर शिक्षणदेखील याच महाविद्यालयातून सन 2011 साली विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले. यानंतर पशुवैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता मुंबई येथील एका सेवाभावी संस्थेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. दरम्यानच्या काळात वैवाहिक जीवनास सुरुवात झाल्याने दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे निभावणे सुरू झाले. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया (Endoscopic Surgery) यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी सुरू केली व सन 2013मध्ये पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या वर्ग 1च्या राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली. पशुधन विकास अधिकारी म्हणजे ग्रामीण भागातील पशुपालकाच्या गोठ्यापर्यंत जाऊन त्याला सेवा देणारा एकमेव क्लासवन अधिकारी असल्याने त्यांची खरी परीक्षा तर पुढेच होती. “कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती’ या उक्तीप्रमाणे त्या पशुपैदास केंद्र, कोपरगाव (जि. अहमदनगर) येथे रुजू झाल्या. सुरुवातीचा काळ हा अनेक नवीन तांत्रिक व प्रशासकीय गोष्टी शिकण्यात गेला. शासकीय पशुवैद्यक म्हणून मुक्या जनावरांची सेवा करत असताना सर्वसामान्य पशुपालक व हाताखालचा स्टाफ यांना सोबत घेताना तांत्रिक ज्ञानासोबतच प्रशासकीय कौशल्याचा देखील कस लागतो.
एक जबाबदार महिला शासकीय अधिकारी असल्याने समाजातील सर्वसामान्य महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे ही आपली प्राथमिकता असल्याचे डॉ. प्रेरणा सांगतात. याकरिता त्या कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्धव्यवसाय या क्षेत्रात महिलांना पुढे येण्यास सदैव प्रवृत्त करतात. त्यांचे हे काम पाहून त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक युवती या क्षेत्रात शिक्षण घेण्यास व काम करण्यास उद्युक्त झाल्या आहेत. त्यांच्या याच उत्कृष्ट तांत्रिक व प्रशासकीय कामाची दखल घेऊन नुकताच त्यांना अहमदनगर जिल्हा परिषदेतर्फे “गुणवंत पशुवैद्यकीय अधिकारी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नुसताच 8 मार्च हा महिलादिन साजरा न करता आम्ही महिलांनीच महिलांना स्वत:मधली शक्ती जागृत करायला शिकवलं पाहिजे. त्यांच्यातील सुप्तगुणांची ओळख त्यांना करून दिली पाहिजे. स्त्री सशक्त होणे, सक्षम होणे म्हणजे पुरुषांशी चढा-ओढ लावणे नव्हे; तर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभे राहणे होय.
कुटुंबाचा पाठिंबा हवाच
व्यवसायाने पशुवैद्यक असल्यामुळे कामाची वेळ ठराविक नाही. रात्री-अपरात्रीदेखील सेवा द्यावी लागते. कुटुंबाचा खंबीर पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही, असे त्या सांगतात. पशुवैद्यक असलेले पती, सासू-सासरे व लहान मुलगी असे त्यांचे कुटुंब त्यांना वेळोवेळी समजून घेते व रोज नव्या उमेदीने काम करण्याचे बळ देते.
प्रतिमा टिकवून ठेवणे महत्त्वाचे
एका स्त्रीने प्रशासकीय आणि तांत्रिक कौशल्य उत्तमपणे वापरून जनमानसांत आपली चांगली प्रतिमा निर्माण करणे आणि ती टिकवून ठेवणे हे आजही आपल्या समाजात मोठे दिव्य आहे. नवीन ठिकाणी बदली झाल्यानंतरही जुन्या कामाच्या ठिकाणाहून अनेक लोकांचे फोन येतात आणि “मॅडम आज तुम्ही पाहिजे होतात, माझी लाखमोलाची गाय जगली असती’, असे म्हणतात तेव्हाच आपल्या कामाची व वेगळेपणाची पोचपावती मिळते.
संकलन : राजेंद्र सुरसे, आंबेठाण