मेलबर्न – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरी गाठलेल्या भारतीय संघाला आता विश्ववितेजेपद केवळ एक पाऊल लांब आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत जागतिक विजेते बनून इतिहास घडविण्याची संधी भारतीय महिला संघाला मिळालेली आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडशी होणार होता. मात्र, संततधार पावसाने पूर्ण सामनाच रद्द झाला होता. त्यात साखळीतील सर्व सामने जिंकल्याने भारतीय संघाची गुणसंख्या इंग्लंडपेक्षा अव्वल ठरल्याने भारताला पुढे चाल मिळाली.
विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी या स्पर्धेत उतरलेल्या भारतीय संघाने सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचाच पराभव केला होता, त्यामुळे पुन्हा त्यांच्याशीच अंतिम लढत होणार असल्याने भारतीय संघालाच संभाव्य विजेते मानले जात आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा 8 मार्चला वाढदिवस असल्याने जर भारतीय संघाने विजेतेपद मिळविले तर तो दुग्धशर्करायोग ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सर्व प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये विश्वकरंडक स्पर्धा सर्वात मानाची समजली जाते. या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम सामन्यात एखाद्या खेळाडूचा वाढदिवस येत आहे हे पहिल्यांदाच घडत आहे. आयसीसी विश्वकरंडक, टी-20 आणि चॅम्पियन्स करंडक तसेच 19 वर्षाखालील विश्वकरंडक या सगळ्या स्पर्धांचे आजपर्यंत अनेकदा आयोजन झाले आहे.
मात्र, कर्णधाराच्या वाढदिवशी अंतिम लढत होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. हरमनप्रीतचा 8 मार्च 1989 साली पंजाबमध्ये जन्म झाला. रविवारी ती वयाची तिशी पार करेल. वैयक्तिक पातळीवर हरमनप्रीत या स्पर्धेत यशस्वी ठरलेली नसली तरी तिचे नेतृत्व मात्र प्रचंड यशस्वी ठरले आहे.