वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – जर मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळला असता तर समोरच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली असती, असे विधान महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले. याला प्रत्युत्तर देताना आमदार शेळके यांनी आपल्या अपयशाचे खापर राष्ट्रवादीवर फोडू नका असा टोला लगावला.
याबाबत बोलताना आमदार शेळके म्हणाले की, आप्पा बारणे हे नक्कीच विजयी होणार आहेत. मात्र आपले मताधिक्य कमी होणार असल्याने त्याचे खापर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर फोडण्याचे काम बारणे यांनी करू नये.
त्यांच्या विजयासाठी स्वतः अजित पवार यांनी मावळ तालुक्यात सभा घेतली. जिथे जिथे अडचणी वाटतील तिथे त्या सोडण्याचे काम अजितदादांनी केले आहे. त्यामुळे जाणीवपूर्व कोणत्या बातम्या किंवा अफवा पसरविण्याचे काम बारणे यांनी करू नये.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बारणे म्हणाले होते की आमदार आणि पदाधिकार्यांनी काम केले. मात्र काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले नाही. ही जर माहिती बारणे यांच्याकडे होती तर ती मतदानापूर्वी आम्हाला द्यायला पाहिजे होती. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली.
पुढे मताधिक्य कमी होईल. हे मताधिक्य कमी होताना इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आरोप करायचे. आपल अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खापर फोडू नये. बारणे यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी होती हे त्यांना मान्य करावे लागेल. तरी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झोकून काम केले. आमच्या कार्यकर्त्यावर जर कोणी असे आरोप करीत असेल तर त्यांच्याशी न बोलणेच योग्य राहिल.
विजयाचे श्रेय स्वतःच्या कर्तुत्वामुळे अशा पद्धतीने स्वतःची टीमकी बारणे यांनी वाजविणे योग्य नाही. बारणे हे कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून येतील. त्यामुळे त्यांनी कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला विसरू नये. बारणे यांना उमेदवारी मिळण्याअगोदर आमच्या पक्षाचा उमेदवारीसाठी आग्रह होता.
मात्र त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही तन, मन आणि धनाने झटून काम केले. आपण आपली बाजू कमकुवत आहे, हे झाकण्याचे काम बारणे यांनी करू नये. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केले आहे, हे बारणे यांनी विसरू नये.
निकालानंतर पडसाद उमटणार?
निवडणुकीच्या प्रचारात हातात हात घालून काम करणारे महायुतीचे नेते निवडणूक प्रक्रिया पार पडताच आत्तापासूनच एकमेकांवर आरोप करू लागले आहेत.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाचे पडसाद नक्कीच मावळ तालुक्यात उमटतील. याचा थेट परिणात आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे आगामी काळात युती राहणार की नाही, याबाबतही कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. मात्र महायुतीतील या कलगीतुर्यामुळे मतदारांचे मात्र मनोरंजन होत आहे.