तळेगाव दाभाडे – (वार्ताहर) – मावळ तालुक्यात गेल्या आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिक उत्पादक शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामाला लागले आहेत.
मावळ तालुका हा खरीप भात उत्पादनाचा तालुका असून येथील प्रत्येक गावातील शेतकरी हे कमी अधिक प्रमाणात खरीप भात शेती करीत असतात.
भात पिकास मोठ्या प्रमाणावर मान्सूनच्या पावसाची गरज असते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाची जोरदार सुरुवात होते. मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी खरीप भात पिकाच्या पूर्व मशागतीची कामे करावी लागतात.
गेल्या आठवड्यात अवकाळीचा जोरदार पाऊस झालेला असून आता शेतकरी भात पिकांच्या पूर्व मशागतीची कामे करू लागला आहे. नांगरणी, कुळवणी कामात शेतकरी मग्न झालेला आहे. भात रोपे तयार करण्यापूर्वीची मशागत शेतकरी करू लागला आहे.
सहा सात महिने तापलेली जमीन अवकाळी पाऊस पडल्याने मऊसर झाली आहे. त्यामुळे नांगरणी, कुळवणी करून जमीन भात रोपे तयार करण्यासाठी तयार केली जाते. मावळात यावर्षी १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.