तेजस्वी सातपुते
सातारा जिल्ह्यात जवळपास वीस वर्षांनंतर महिला अधीक्षकांची नेमणूक झाली. तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून गेल्या वर्षभरात जिल्हा पोलिसांच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाली आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबरोबरच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलीस दलाने चांगलीच आघाडी घेतली आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचारांच्या आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.
मालमत्तेच्या (चोऱ्या, घरफोड्या) गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यात आणि ते उघडकीस आणण्यातही पोलीस दलाला यश येत आहे. महिला व मुलींच्या रक्षणासाठी जिल्ह्यातील निर्भया पथके सदैव सतर्क आहेत. महिलांना आत्मरक्षणाचे धडे या पथकांमार्फत देण्यात येत असल्याने महिला वर्गाला अधिक सुरक्षित वाटत आहे. पोलीस व नागरिकांमध्ये सुर्सवाद घडवून आणल्याने पोलीस दलाबद्दल नागरिकांना विश्वास वाटत आहे.
त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी अभिनव संकल्पना राबविण्यात येत असून पोलिसांच्या निवासासाठी नव्या इमारती साताऱ्यात उभ्या रहात आहेत. अशा सर्वच आघाड्यांवर सातपुते यांची कामगिरी तेजस्वीफ असून त्या खऱ्या अर्थाने “सुपरवूमन’ ठरल्या आहेत. त्यांची कामगिरी जिल्हावासीयांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील, हे नक्की.
मीरा बोरवणकर यांनी 1996 ते 1999 या कालावधीत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक होत्या. त्यांच्यानंतर जवळपास वर्षांनी तेजस्वी सातपुते यांना सातारा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळायची संधी मिळाली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच दिसणारी संवेदनशीलता तेजस्वी सातपुते यांच्याकडेही आहे. याचा अनुभव सातारकर घेत आहेत. सातपुते यांनी अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा निवडणुकांची धामधूम होती. आधी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि त्यानंतर चार ते पाच महिन्यांनी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली.
त्यावेळी उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघाची पोनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबर जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानही नेत्यांच्या पक्षबदलांमुळे अनेक स्थित्यंतरे झाली. त्यामुळे जिल्ह्यात निवडणूक अतिशय अटीतटीची होती. निवडणुकीचे वातावरण अतिशय तापले होते आणि मतदारसंघ संवेदनशील असल्याने काहीही घडू शकेल, अशी स्थिती होती. त्यामुळे पोलीस दलाला डोळ्यांमध्ये तेल घालून काम करावे लागत होते. ही अतिशय आव्हानात्मक असलेली परिस्थिती तेजस्वी सातपुते यांनी मोठ्या कौशल्याने हाताळली.
त्यामुळे निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सातपुते यांच्या आदेशानुसार समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आणि प्रत्येक गोष्टीवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले. त्यामुळे महसूल विभागाचे कामही सोपे झाले. या कालावधीत पोलिसांना नेहमीच्या कामांकडे (गुन्हे रोखणे व उघडकीस आणणे) व नियमित “पोलिसिंग’ लक्ष द्यायला तसा फारसा वेळ नसतो. मात्र, निवडणुकीच्या काळात ही तारेवरची कसरत जिल्हा पोलीस दलाने केली, त्याचे कारण खमक्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.
निवडणुकीनंतर तर गुन्ह्यांच्या बाबतीत तातडीने पावले उचलली गेली. गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास आणि ते उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच्या काळातील गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास शरीराविरुद्धच्या एकूण गुन्ह्यांमध्ये (खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी व दुखापत) गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे शंभर गुन्ह्यांची घट झाली आहे. महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी निभर्या पथकांनी जिल्ह्यात प्रभावी कामगिरी केली. या पथकांचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी फिनोलेक्स कंपनीकडे पाठपुरावा करून तीन बोलेरो जीप मिळविण्यात आल्या. परिणामी महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे बऱ्याच अंशी कमी झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये पाच, अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 18 आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये 14 ने घट झाली.
मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तीनने घट झाली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत चारने वाढ झाली. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत दहा गुन्हे कमी उघडकीस आले होते; परंतु निवडणुका संपताच “चेनस्नॅचिंग’ रोखण्यासाठी बीट मार्शलची योजना प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेतही बदल करण्यात आल्याने गेल्या दीड महिन्यात घरफोडीचे तब्बल शंभर गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखला यश आले.
सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांना जरब बसविण्यात आली आहे. तडीपारीच्या 23 प्रस्तावांमध्ये दोघांना हद्दपार करण्यात आले तर आठ प्रस्तावांमध्ये 30 जणांकडून चांगल्या वर्तणुकीची हमी घेण्यात आली. वैयक्तिक दहशत माजविणाऱ्या 101 गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्यातील 26 जणांवर कारवाई झाली आहे. संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी 14 टोळ्यांमधील 103 जणांवर “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सैनिक हो, तुमच्यासाठी
सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो; परंतु आजी व माजी सैनिकांना त्यांच्या समस्यांमध्ये मदत मिळण्यासाठी झगडावे लागते. त्यातून त्यांच्या देशसेवेची एक प्रकारे अवहेलना होत असते. याची जाणीव ठेवून तेजस्वी सातपुते यांनी आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी महिन्याच्या पहिल्या शनिवारी मेळावे घेण्याची संकल्पना राबवली आहे. पोलिस कवायत मैदानावर होणाऱ्या या मेळाव्यांना सातपुते स्वत: उपस्थित राहून सैनिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात पोलीस दलाविषयी चांगली भाव निर्माण झाली आहे.
सागरिका कॅंटिनमध्ये पोलिसांना स्वस्तात
किराणा माल व इतर साहित्य उपलब्ध
वाढदिवसाला सुट्ट्या व शुभेच्छापत्रांचा उपक्रम
जलद कृती दलासाठी अत्याधुनिक इमारत
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक
शिबिरांचे आयोजन
महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त
साड्या, मिठाईचे वाटप