Sunetra Pawar-Supriya Sule । राज्यातील लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात आगामी लोकसभा एकमेकांच्या विरोधात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. राजकीय वर्तुळात नणंद-भावजयमध्ये रंगणाऱ्या या निवडणुकीच्या चुरशीची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आता पुन्हा राजकीय वर्तुळात या नणंद-भावजयची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे, लवकरच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एका मंचावर एकत्र दिसणार आहेत.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच मंचावर Sunetra Pawar-Supriya Sule ।
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे तुकाराम बीज साजरी केली जाते. गेली अनेक वर्ष सुप्रिया सुळे तुकाराम बीजेच्या निमित्तानं कार्यक्रमाला हजेरी लावतात. यावर्षी सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे या नणंद-भावजय एकाच मंचावर हजर राहणार असल्याने या कार्यक्रमात नेमकं काय घडणार हे पाहणे गरजेचे आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे तुकाराम बीजेसाठी भाविक एकत्र येत असतात. याचंच औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आज सकाळी सव्वाअकरा वाजता सुनेत्रा पवार तर अकरा वाजता सुप्रिया सुळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतील, असं त्यांच्या नियोजित दौऱ्यात वेळ ठेवण्यात आली आहे.
बारामतीतून मराठा समाजाचा उमेदवार रिंगणात Sunetra Pawar-Supriya Sule ।
बारामती लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मराठा समाजाचा एक उमेदवार देणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. बारामती शहरातील जिजाऊ भवन येथे मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक झाली. त्यामध्ये आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मराठा उमेदवार देणार असल्याचा एकमतानं निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची बारामतीत बैठक होईल आणि त्यानंतर एकमुखानं बारामती लोकसभा मतदार निवडणुकीसाठी मराठा समाजाचा एक उमेदवार ठरणार आहे आणि तोच उमेदवार बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.