मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून १२ दिवस उलटले तरी देखी अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत खेचा खेची सुरु आहे. शिवसेनेकडून सत्तेत ५०-५० आणि मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षांसाठी हक्क सांगण्यात येतोय. मात्र भाजप मुख्यमंत्री पदाबाबत कुठलीही तडजोड करायला तयार नसल्याची परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने आज भाजपने कोरकमीटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचबोललं जात आहे. या बैठकी नंतर लवकरच गोड बातमी येऊ शकते असे सूचक विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
शिवसेना-भाजपाला जनतेनं सत्ता स्थापनेसाठी बहुमत दिलेलं असतानाही सत्तावाटपावरून त्यांचं घोडं अडलं आहे. या पार्शवभूमीवर फडणवीसांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली असून, त्या भेटीतही मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर फडणवीस आणि शाह यांचं एकमत झाल्याचीही चर्चा आहे.
तसेच आजच्या बैठकी नंतर महायुतीचंच सरकार येणार आणि देवंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं अहे. त्यामुळे मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून युतीतील कोडं काही प्रमाणात सुटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या बैठकीनंतर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, महाजनादेश महायुतीबरोबर आहे. आम्ही शिवसेनेची वाट पाहू. सरकार आमचंच बनणार आहे. देवेंद्र यांच्या नेतृत्वातच आमचं सरकार बनणार असल्याचं आम्ही स्पष्ट केलेलं आहे. शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे, प्रस्ताव काय आहे हे जाहीरपणे सांगायचं नाही हे ठरलेलं आहे. सरकार आमचंच येणार असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगू शकतो. सरकार जनतेच्या महाजनादेशाचा आशीर्वाद घेऊन बनणार आहे. देवेंद्र यांच्या नेतृत्वात सरकार बनणार असून, त्यात किंतु आणि परंतु असं काहीही नसणार आहे, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.