खेडच्या दक्षिण भागातील स्थिती : 70 एकर बाधित क्षेत्राचा पंचनामा
चिंबळी- परतीच्या पावासाने यंदा सर्वत्र थैमान घातले असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. खेडच्या दक्षिण भागत या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वाधिक सोयाबीन पिकास या परतीचा पावसाचा फटका बसला आहे.
दक्षिण भागात दोन दिवसांत 70एकर बाधित क्षेत्राचा पंचनामा झाला असल्याची माहिती तलाठी बी. बी. पाटील, दीपक जाधव यांनी दिली.
चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, गोलेगाव, सोळू, धानोरे परिसरातील शेतकरी वर्गाने घेतलेल्या खरीप हंगामातील सोयाबीन, भात, मका, भेंडीसह इतर पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आळंदीचे मंडल अधिकारी चेतन रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाधित क्षेत्रातील पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याची सुरूवात केली असल्याचे चिंबळीचे तलाठी बी. बी. पाटील यांनी सांगितले. तर कुरुळी, मोई, निघोजे परिसरातील पिकांची पाहणी करून कुरुळी-मोईचे तलाठी दीपक जाधव, कृषी सहायक संतोष सोरोदे, महेंद्रसिंह ठाकूर, आर. बी. सुळ, सचिन गोडसे, नाना जैद, निलेश गवारे यांच्यासह सर्व कर्मचारी पंचनामा करण्याचे काम करीत आहेत.