Sudhir Mungantiwar : राज्यात मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वाघनखांवरून राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भाजपा नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनंख आणण्याबाबत करार करण्यासाठी इंग्लंडला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आले आहेत.यावरून प्रहारचे प्रमुख बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) मुनगंटीवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी, “बच्चू कडू यांनी असं उपाहासात्मक बोलण्याची आवश्यकता नव्हती. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, असं म्हणतील. कारण आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. एका लोकसभेच्या निवडणुकीला २५ कोटींचा खर्च होतो. त्यामुळे २० वर्षांतून एकदा निवडणुका घ्या, अशी सूचना त्यांनी केली नाही, हे बरं झालं.” उपहासात्मक टीका देखील त्यांनी केली. त्यासोबतच “खरं तर, अशाप्रकारे ऑनलाईन एमओयू करता येत नाही, हे कदाचित त्यांना माहीत नसेल. अनेकदा आमदार विधीमंडळात निवडून येतात, पण माहितीच्या अभावी ते अशापद्धतीने प्रतिक्रिया देत असतात,” असा टोलाही सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी लगावला.
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) पुढे म्हणाले, “बच्चू कडूंकडून (Bacchu Kadu) ही अपेक्षा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक आस्था असणाऱ्या वाघनखांच्या बाबतीत त्यांनी असं भाष्य केलं असेल तर ते योग्य नाही. शेवटी त्यांनाही लाखो रुपयांचा पगार जनतेनं कराच्या रुपात भरलेल्या पैशातून दिला जातो. तो पगार घेताना त्यांना असं काही वाटलं नाही. उद्या अधिवेशन ऑनलाईन घेतलं तर करोडो रुपये वाचतील, अशी सूचना त्यांची कदाचित असू शकते. कारण अधिवेशनात एका मिनिटाला ७० हजार रुपये खर्च होतात.”
दरम्यान, “सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत”, असा टोला बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) एका कार्यक्रमात लगावला होता. त्यांच्या याच टीकेला सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी उत्तर दिले आहे.