कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील लक्ष्मण जोरवर हे रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता, त्यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जोरवर यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी घरातील सव्वातीन लाखांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील ओगदी येथील शेतकरी लक्ष्मण जोरवर यांची गावापासून काही अंतरावर वस्ती आहे. शेतीपंपांसाठी रात्री वीजपुरवठा होत असल्याने जोरवर आज पहाटे (दि.9) एकच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यानंतर पहाटे पावणेदोनच्या सुमारास दरोडेखोरांनी जोरवर यांच्या घराचा दरवाजा दगडी पाट्याने तोडून घरात प्रवेश केला.
यावेळी घरात झोपलेल्या जोरवर यांच्या पत्नी कमलबाई जोरवर (वय 45) यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करत दहशत निर्माण केली. तसेच घरातील सामानाची उचकापाचक करीत घरात ठेवलेले रोख 50 हजार रुपये व 6 तोळे सोने, असा 3 लाख 18 हजारांचा ऐवज चोरून दरोडेखोर पसार झाले.
दरोडेखोपर गेल्यानंतर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कमलबाई जोरवर यांनी स्वतःला सावरत आरडा ओरड केला. मात्र दरोडेखोरांनी शेजारील घरांच्या बाहेरुन कड्या लावल्याने शेजाऱ्यांना त्यांच्या मदतीस जाण्यास अडथळा येत होता.
तब्बत तासभराने काही शेजारी जोरवर यांच्या घरी मदतीसाठी गेले असता, कमलबाई गंभीर जखमी अवस्थेत त्यांना दिसल्या. यावेळी रवींद्र पोळ, विष्णुपंत कोल्हे यांनी कमलबाई यांची अवस्था पाहून युवा नेते विवेक कोल्हे यांना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दूरध्वनीवरून संपर्क करून रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली.
त्यानंतर विवेक कोल्हे यांनी तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविली. तसेच जखमी कमलबाई जोरवर यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. वेळेत उपचार सुरू झाल्याने जखमी कमलबाई यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना समजताच ते फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून दरोडेखोरांच्या शोधासाठी दोन पोलीस पथके तयार करून ती शोधासाठी रवाना केली. जखमी कमलबाई यांचा रुग्णालयात जावून जबाब नोंदवून अज्ञात तीन दरोडेखोरांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सध्या तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. तालुक्यात पोलिसांपेक्षा चोरांची दहशत वाढत आहे. तेव्हा पोलीस प्रशासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
शेतकरी सर्वच बाजूंनी संकटात
महावितरणतर्फे दिवसा ऐवजी रात्री शेतीपंपाला वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना रात्रभर जीव धोक्यात घालून शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते. थंडी-वाऱ्यात जंगली श्वापदांशी सामना करुन शेती करावी लागते. त्यातच रात्री शेतकरी घरी नसल्याचा फायदा दरोडेखोर घेवून त्यांच्या घरावर दरोडा टाकत आहेत. त्यामुळे कष्टमय जीवन जगणारा जगाचा पोशिंदा सर्वज बाजूंनी अडचणीत आला आहे.