हिंजवडी- हिंजवडीला आयटी पार्कची उभारणी करण्यात पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून केवळ आयटीचा विस्तार करण्याचा त्यांचा संकल्प होता. परंतु नंतरच्या काळात सरकारमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने या भागाची डेव्हलपमेंट नियोजनबद्ध झाली नाही. याकरिता अतिशय वेगाने वाढणाऱ्या हिंजवडी, माण परिसराचे नागरीकरण सरकारने तातडीने थांबवावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हिंजवडी, माण या भागात ट्रॅफीकच्या समस्यांमुळे आयटीकंपन्यांऐवजी रहिवासी सोसायट्याच अधिक झाल्याने रस्ते, पाणी, वीज, दळणवळण, कचरा, सांडपाणी, पब्लिक ट्रान्सपोर्ट यांसारखे असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत. निसर्गसौंदर्यामुळे स्वप्नातील घरांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून येथे वास्तव्यास आलेल्या राज्य, परराज्यातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यास बिल्डर व शासन अकार्यक्षम ठरत असेल तर आयटी परिसरातील ही गावे तातडीने महापालिकेत समाविष्ट करावित, अशी आग्रही मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.
आयटी उद्यानाच्या माण फेज थ्री भोईरवाडी येथील मिलांज सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. या वेळी येथील रहिवाशांनी बिल्डर, पीएमआरडीए, ग्रामपंचायत यांच्याकडून पायाभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींचा पाढा सुळे यांच्यासमोर वाचला.या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, माजी सभापती कोमल वाशिवले, उपाध्यक्ष बाबाजी शेळके, नीलेश भोईर, बाळू बालवडकर, शंकर भोईर, सुनीता भोईर, मिलांज सोसायटीचे चेअरमन शशांक मिश्रा, सचिव पंकज चिंतामणी, विपीन श्रीवास्तव, खजिनदार अभिषेक सिंग यांच्यासह शेकडो रहिवासी उपस्थित होते.
या वेळी सोसायटीधारकांनी कायमस्वरूपी शासकीय शुद्ध पाणी पुरवठा, एसटीपी पाण्याचा निचरा व्यवस्था, सोसायटीपर्यंत येणारे रस्ते रुंदीकरण आणि दिवाबत्ती, सांडपाणी, ड्रेनेजलाइन आणि पाणी तुंबणे, शहर कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक वाहतूक समस्या, पीएमपीएमएल बस कनेक्टिव्हिटी, फेज 3 (यश टेक्नॉलॉजी) ला स्थानिक कनेक्टिव्हिटी, रस्ते आणि पदपथांची नियमित स्वच्छता, विजेची समस्या, बिल्डरांकडून अमेनिटीज व अन्य कमिटमेंटबाबत झालेली फसवणूक, टाउन प्लॅनिंग इन्फ्रास्ट्रक्चर जसे की बागा, हॉस्पिटल, ग्रामपंचायतीकडून अधिकची करआकारणी मात्र कचरा उचलणे दिवाबत्ती आशा सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अकार्यक्षम ठरत असल्याच्या तक्रारी त्यांनी मांडल्या.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
सोसायटीच्या आसपासच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त आहे. कारण ही कुत्री रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार आणि शाळेतील मुलांसाठी धोकादायक आहेत. अंगावर धावून आलेल्या कुत्र्यांना दगड जरी मारला तरी काही प्राणिमित्र पोलिसांकडे तक्रार करतात. ही समस्या हाताळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करत नाही मग न्याय मागायचा कुणाकडे?