संगमनेर – उमेदवारांसह कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढत आहे. त्यात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर आहे. यानिमित्ताने आज आघाडीचे उमेदवार तथा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्यातील खांबा येथे गेले असता चहा टपरीवर ग्रामस्थांसोबत चहाचा घोट घेत निवडणुकीवर “चाय पे चर्चा’ केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारनिमित्त सकाळपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकारी बाहेर पडून जोमाने प्रचार करत आहे. मतदारसंघातील गावागावांत जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटून उमेदवाराला मतदान करण्यास आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान,आ. थोरात यांच्या आश्चर्यकारक कृतीचे दर्शन घडले. एरव्ही मतदारसंघातील नागरिकांच्या सुख-दुःखात कायमच सहभागी होणारे आ.थोरात यांची आज वेगळी कृती पाहायला मिळाली.
सकाळीच घराबाहेर पडले आणि खांबा येथे थांबले. खांबा येथे आले असता त्यांना येथील चहाच्या टपरीवर ग्रामस्थ चहाचा सुरका मारताना दिसले. त्यांनी लगेच आपल्या वाहन चालकाला येथे थांबण्यास सांगितले. वाहनातून उतरत थेट चहा टपरी गाठली आणि ग्रामस्थांमध्ये जाऊन मिसळले. त्यांच्याबरोबर चहाचा घोट घेत गावातील समस्या आणि करावयाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. याचवेळी थोरात इथे थांबलेले पाहून इतरही ग्रामस्थ इकडे वळाले आणि त्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
थोरात यांनी ‘यशोधन’ कार्यालय स्थापन करून जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना या माध्यमातून फायदा झाला आहे. यामुळे थोरात तालुक्यातील घराघरांत पोहचले आहे. थोरात हे कायम आपल्या अनोख्या आपुलकीच्या कृतीबाबत चर्चेत असतात. त्याचाच प्रत्यय यानिमित्ताने आला.