जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार
सातारा – जिल्ह्यास मार्चअखेरपर्यंत मिळालेला निधी खर्च करण्यासाठी आढावा घेतला असून कोणत्याही परिस्थितीत निधी परत जाऊ दिला जाणार नाही. येत्या 27 तारखेला अर्थ मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रादेशिक आराखडा बैठक होत असून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही अर्थ व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली.
श्री. देसाई यांनी वित्त, राज्य उत्पादन शुल्क, पणन, कौशल्य विकास आदी विभागांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलते होते. देसाई म्हणाले, “”मार्च महिन्यास दोन महिने राहिले असून, अखर्चित निधी खर्च होण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दोन-तीन विभागांचा अपवाद वगळता इतर विभागांचा निधी मार्गी लागला आहे. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात निधी वाढवून मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.”
जिल्हा बॅंकेचे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत शिवसेनेची भूमिका काय असणार या प्रश्नावर ते म्हणाले, “”राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते खाली यावे, हे माझे मत आहे. वरिष्ठांची चर्चा करून ते जसे आदेश देतील, तसे काम करणार आहे.”
बाजार समित्या भक्कम करण्यासाठी, त्यांना आर्थिक सुबकता देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी प्रयत्न करणार आहे. बाजार समित्यांत काय अडचणी आहेत, त्याची कारणे काय हे अभ्यासून त्यात सुधारणार केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यास गेलो. तेव्हा त्यांनी कौशल्य विकासवर विशेष भर देण्यास सांगितले.
आयटीआयचे पारंपारिक कोर्स बदलून कंपन्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार कौशल्य विकाससाठी अधिक लक्ष केंद्र करणार असल्याचे स्पष्ट करून रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी माझी भेट घेतली. त्यांच्याबरोबर कौशल्य विकास वाढीसाठी प्रयत्न करता येतील का, यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे श्री. देसाईंनी सांगितले.
साताऱ्याच्या एसपींना साखरेचा चहा
विशेष महानिरीक्षक (आयजी) सुहास वारके, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आज सकाळी निवासस्थानी भेट घेतली. त्यांना मी चहा दिला, असे मंत्री देसाईंनी सांगितले. त्यांना साखरेचा चहा दिला, मी बिनसाखरेचा घेतला, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली. त्यावर “त्यामुळे आता गोडवा वाढला असेल, मग तुम्ही एसपींवर दाखल केलेल्या राजशिष्टाचार भंगाचे काय झाले, या प्रश्नावर “”विधीमंडळात मी तक्रार केली असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. गृहखात्याचा मी मंत्री असल्याने प्रोटोकॉलनुसार ते मला भेटण्यास आले होते,” असे उत्तरही त्यांनी दिले.