राहुरी विद्यापीठ -प्रसाद शुगर अँड अलाईड ऍग्रो प्रॉडक्टस् लिमिटेड वांबोरी कारखान्याचा तीस केएलपीडी क्षमतेचा आसवनी प्रकल्प येत्या डिसेंबर महिन्यात, तर 23 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प 2021 वर्षात कार्यान्वित करण्याचा मानस आहे. यंदा सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांनी सांगितले.
नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते प्रसाद शुगरच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकून, सन 2020-21 या वर्षाच्या नवव्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला, यावेळी देशमुख बोलत होते.
ज्येष्ठ संचालक सुरेश बाफना, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, प्रकाश देठे, विजय माळवदे, चीफ जनरल मॅनेजर विकास आभाळे, जनरल मॅनेजर (प्रक्रिया) ज्ञानेश्वर रसाळ, जनरल मॅनेजर (शेतकी) गोरक्षनाथ ढोबळे, वर्क्स मॅनेजर संजय म्हस्के उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, यंदा तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. मान्सूनचा परतीचा पाऊस तालुक्यात सक्रिय झाला आहे. त्यामुळे, उसाच्या प्लॉटमध्ये पाणी भरलेले आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसामुळे ऊस तोडणीसाठी समस्या उद्भवणार आहेत. यंदा तालुक्यात बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उभा आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदविलेल्या सर्व उसाचे गाळप केले जाईल. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. कारखान्यात साखरेबरोबरच उपपदार्थ निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होतील, असेही देशमुख यांनी सांगितले.