कोलंबो – श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटासोबतच आता तेथे राजकीय संकटही गडद होत आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विनंतीनंतर पीएम महिंदा यांनी हा निर्णय घेतला आहे. आणीबाणीनंतरच्या आर्थिक संकटामुळे त्यांना पद सोडण्याची विनंती करण्यात आली होती.
पीएम महिंदा यांनी यापूर्वीच श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाला त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली होती. महिंदा यांच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळातही वितुष्ट येऊन राजकीय संकट आणखी गडद होऊ शकते. महिंदा राजपक्षे यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की, श्रीलंकेतील आर्थिक संकटावर त्यांचा राजीनामा हाच एकमेव उपाय असेल तर ते तसे करण्यास तयार आहेत.
कोलंबोमध्ये हिंसक संघर्ष, 20 जखमी
दरम्यान, राजधानी कोलंबोमध्ये आज सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी सरकारचा विरोध करणाऱ्या लोकांवर हल्ला चढवला. सरकार समर्थकांची पोलिसांशी झटापट झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि वॉटर कॅनर्स सोडले. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाच्या दरम्यान, सामान्य लोक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत.