कोलोंबो – माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणातील ३ माजी दोषी आज श्रीलंकेत परतले आहेत. श्रीलंकेत पोचल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. मुरुगन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार या तिघांनी राजीव गांधी हत्या प्रकरणी आतापर्यंत ३ दशकांची तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे. भारतातील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी श्रीलंकेला परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तामिळनाडूतून ते कोलंबो येथे दाखल झाले.
चेन्नईतून विमानाने निघाल्यावर कोलोंबोतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारात तिघेही उतरले. त्यानंतर ५ तास त्यांचा जबाब नोंदवून घेण्याचे काम चालले. या तिघांबरोबर संथान या चौथ्या दोषीची २०२२ मध्ये तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यांना तिरुचिरापेल्ली येथील विशेष छावणीमध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्यांना श्रीलंकेला परत पाठवण्यासाठी चेन्नईला आणले गेले होते.
सुटका झालेला चौथा दोषी संथान उर्फ टी सुथेनदिराराजा याचे प्रत्यार्पणापूर्वीच १ मार्च रोजी चेन्नईमध्ये मुत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाले होते. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील एकूण ७ दोषींची २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली होती.
पेरारीवलन, रविचंद्रन आणि नलिनी हे अन्य तिघे भारतीयच आहेत. श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम अर्थात एलटीटीई या फुटिरवादी संघटनेने १९९१ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची आत्मघातकी बॉम्बस्फोटाद्वारे हत्या घडवून आणली होती.