सातारा (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. अगदी सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पारा 40 अंशावर जात आहे. एवढ्या कडक उन्हातही करोनाला रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. याची जाण ठेऊन गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी उन्हातान्हात कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांना लस्सीचे वाटप केले आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाने भारतात विशेषत: महाराष्ट्रातही कहर केला आहे. साताऱ्यातही करोनाबाधितांची संख्या शंभरी पार करुन 116 वर जाऊन पोहोचली आहे. करोनाला रोखण्यासाठी देशात सुमारे दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. जिल्ह्यातही सर्व काही बंद आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे वारंवार प्रशासन सांगत आहे. तसेच विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस कर्मचारी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर चोख बंदोबस्त बजावत आहेत. मात्र गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असल्याने बंदोबस्तावर असणाऱ्या या पोलिसांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
कडाक उन्हामुळे पोलिसांची होत असलेली तगमग गृहराज्य मंत्री असणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या नजरेतून सुटली नाही. आणि त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना कडक उन्हापासून थोडासा आराम मिळावा, यासाठी रविवारी थंडगार लस्सीचे वाटप केले आहे. उन्हातान्हात कर्तव बजावत असताना सुकलेल्या पोलिसांच्या घशाला लस्सीचा गारवा मिळाल्याने काहीकाळ का होईन पण त्यांची तगमग कमी झाली असावी.
प्रातिनिधीक स्वरुपात सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, माण- खटाव, कोरेगांव, फलटण या तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यामार्फत सुमारे 1875 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लस्सीचे वाटप करण्यात आले.
मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून नेहमीच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. करोनाचे संकट वाढत असताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याकरिता त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्याकरीता ना. देसाई यांनी त्यांच्या संरक्षणाकरीता असणारा सर्व लवाजमा बाजूला ठेवून स्वत: दुचाकीवरून सातारा शहरात फेरफटका मारुन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची तसेच बंदोबस्तामध्ये कसली अडचण नाही ना? याची विचारपूस करुन पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविले.