जामखेड (प्रतिनिधी) – वाढत्या करोना रुग्णांमुळे एक महिना “हॉटस्पॉट’ केंद्र ठरलेल्या व निर्बंध सहन कराव्या लागलेल्या जामखेडकरांना आता दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून शहरातील अत्यावश्यक व्यवहार सुरू होणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नवीन रुग्ण न आढळल्याने शहरातील “हॉटस्पॉट’ शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच 3 मेपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे,’ असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले आहे.
10 एप्रिलपासून जामखेड शहर तीन टप्प्यांत सलग 10 मेपर्यंत “हॉटस्पॉट केंद्र करण्यात आले होते. 17 करोनाबाधित रुग्ण सापडल्याने संपूर्ण शहरच “हॉटस्पॉट’ ठरवून तेथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला. दरम्यान, 26 एप्रिलपासून ते 10 मे या चौदा दिवसांच्या कालावधीत शहरात एकही नवीन रुग्ण आढळून न आल्याने शहरातील हॉटस्पॉट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये दवाखाने, मेडिकल, विकतचे पाणी व वापरण्याचे पाणी सकाळी 7 ते दुपारी 2, दूध सकाळी 7 ते 9, भाजीपाला सकाळी 7 ते 11, किराणा दुकाने सकाळी 9 ते 12, पीठ गिरणी, स्वस्त धान्य दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, तूर, कापूस, हरभरा खरेदी केंद्रे, कृषी सेवा केंद्रे, कृषी उपकरणे, यंत्र दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पशु औषधालय, पशुखाद्य दुकाने, शहरातील सर्व बॅंका, को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी, पेट्रोल-डिझेल विक्री पहाटे 5 ते सायंकाळी 5, ग्रामपंचायत स्तरावरील सीएसपी सेंटर, वर्तमानपत्रे वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.