हैदराबाद – भारतीयच नव्हे तर जगभरात एक विचित्र मानसिकता दिसून येते. एखाद्या पतीला क्रीडाक्षेत्रात किंवा कोणतीही सरस कामगिरी करण्यात अपयश आले तरी त्यासाठी त्याच्या बायकोवरच खापर फोडले जाते. या मानसिकतेचा अनुभव मलाही आलेला आहे, असे भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने सांगितले.
क्षेत्र कोणतेही असो जर पतीने यश मिळविले तर ते त्याच्या कर्तृत्वावर मिळवले असे बोलले जाते. मात्र, त्याला अपयश आले तर त्यासाठी त्याच्या बायकोला जबाबदार धरले जाते. जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला अपयश येत होते तेव्हा अनुष्का शर्मावर टीका होत होती हे आपण सर्वांनीच वाचले व पाहिले आहे.
माझा अनुभव देखील काही वेगळा नाही. ही मानसिकता केवळ भारतातच नव्हे तर जवळपास प्रत्येक देशात दिसते. सारासार विचार करण्याची क्षमता असलेले लोक देखील असा विचार करतात याचे आश्चर्य वाटते, असेही सानिया म्हणाली.