नगर -जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच वार्षिक सरासरीच्या 19 टक्के पाऊस झाला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मृग नक्षत्राच्या पेरण्यांना वेग आला आहे.
नगर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी 516 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. यंदाही जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच जिल्ह्यात सरासरी 94 मिलिमीटर म्हणजेच जवळपास 19 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात सरासरी 26 मिलिमीटर म्हणजे अवघ्या 5 टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 14 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मुग, सोयाबीन, बाजरी, मका पेरणीला वेग आला आहे. बि-बीयाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. यंदा जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये अकोले तालुक्यात- 134 मिलिमीटर, संगमनेर- 83 मिलिमीटर, कोपरगाव- 126 मिलिमीटर, श्रीरामपूर-150 मिलिमीटर, राहुरी- 143 मिलिमीटर, नेवासा- 72 मिलिमीटर, राहाता- 71 मिलिमीटर, नगर- 76 मिलिमीटर, शेवगाव- 80 मिलिमीटर, पाथर्डी- 41 मिलिमीटर, पारनेर- 123 मिलीमीटर, कर्जत- 101 मिलिमीटर, श्रीगोंदा- 64 मिलिमीटर व जामखेड तालुक्यात- 59 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाला असला तरी टॅंकर मात्र बंद झालेले नाहीत. जिल्ह्यातील 97 गावे व 436 वाड्यावस्त्यावरील नागरिकांना टॅंकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांना दररोज 104 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात सर्वात जास्त टॅंकर नगर जिल्ह्यात सुरू आहेत.