नाशिक – लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवस नाशिकमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी एक विषेष रेल्वे गाडी शनिवारी नाशिकहून लखनौला रवाना झाली. सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी ही गाडी रवाना करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यात एकूण 847 प्रवासी होते. आतील प्रवाशांना एकमेकांपासून दूर अंतरावर बसण्यात यावे यासाठी या गाडीला जादा डबे जोडण्यात आले होते. एकूण सतरा डबे या गाडीला जोडण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही गाडी काल रात्रीच रवान होणार होती; पण तिचे प्रयाण काही कारणामुळे लांबले. आता जशा गाड्या उपलब्ध होतील त्या प्रमाणात या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडले जाणार आहे. राज्य सरकारने संबंधित राज्यांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे नागरिक असलेले मजूर येथून घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे.
करोनाच्या संकटात नाशिकमध्ये एक दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. अनेक मजूर आपल्या मुलाबाळांसह सर्व संसार पाठीवर घेऊन पायीच मुंबईहून नाशिकमार्गे आपआपल्या राज्यात निघाले होते. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश होता. त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवून शेल्टर कॅम्पमध्ये ठेवले होते. या शेल्टर कॅम्पमध्ये या मजुरांची रितसर आरोग्य तपासणी, त्यांच्या जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अखेर जिल्हा प्रशासनाने आणि राज्य सरकारने मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारशी बोलून या शेल्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली.
शुक्रवारी (1 मे) रात्री शेल्टर कॅम्पमध्ये असलेल्या तब्बल 345 लोकांना 6 डब्ब्यांच्या विशेष ट्रेनने मध्यप्रदेशला रवाना करण्यात आले. आज (1 मे) सकाळच्या सुमारास 847 उत्तर प्रदेशच्या रहिवाशांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनला रवाना केले.