उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटणार
मुंबई : करोनामुळे रखडलेल्या विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही पाठवण्यात आले आहे. मात्र राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. विधानपरिषदेच्या 9 जागा 24 एप्रिलपासून रिक्त झाल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.
कोणत्या जागांसाठी निवडणूक
24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.