Rajan Salvi : राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील पक्ष संघटन करण्यासाठी सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज राजापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरे हे आमदार राजन साळवींचीही भेट घेणार आहेत. एवढेच नाही तर राजन साळवींच्या घरीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या जेवणाचा बेत असणार आहे. साळवी कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंसाठी आणि रश्मी ठाकरेंसाठी स्वयंपाकाचा खास बेत आखला असल्याचे सांगण्यात येत आहे.
राजन साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या भेटीविषयीची माहिती दिली. याविषयी बोलताना “आज उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी घरी जेवायला येणार आहेत. त्यामुळे गोडं वरण, कोळंबी भात, मोदक, अळूवडी, डाळिंबी उसळ, काजूगराची उसळ, पुरणपोळी असा बेत आम्ही आखला आहे. कोळंबी भात वगळला तर इतर पदार्थ शाकाहारी आहेत. तसंच उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींना आमच्या घरचं जेवण आवडेल असं मला वाटतं.” असं राजन साळवींनी सांगितले आहे.
खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा प्रकारचे बॅनरही लावण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे संभाव्य लोकसभा उमेदवार असण्याची शक्यता आहे. यामुळे बॅनरबाजीतून शक्तीप्रदर्शन केलं जातं आहे. ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. राजापुरात येणारे उद्धव ठाकरे बारसू रिफायनरीबाबत काय भूमिका घेणार याकडे संवांचे लक्ष आहे.