सौ. प्रभा हेंद्रे
फलटणच्या सामाजिक जीवनात कार्य करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सौ. प्रभा चंद्रशेखर हेंद्रे यांची समाजासाठी काही करण्याची तळमळ मोठी आहे. सामाजिक कार्यासाठी अजूनही खूप काही करण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे.
फलटणच्या विवेकानंदनगरातील सौ. प्रभा चंद्रशेखर हेंद्रे हे बहुतेकांना परिचित असे व्यक्तिमत्व आहे. केवळ परिचितच नव्हे तर आपल्या सालस व सदाहसतमुख व्यक्तिमत्वामुळे त्या बऱ्याच मोठ्या वर्तुळात अतिशय लोकप्रिय आहेत. अत्यंत सरळमार्गी असलेल्या प्रभा हेंद्रे अजातशत्रू म्हणून ओळखल्या जातात. कटू विषय टाळून पुढे जाण्याचा स्वभाव असल्याने त्यांना फारसे शत्रू नाहीत.
पाटण तालुक्यातील दिवशी गावातल्या एका मागासवर्गीय गिरणी कामगाराची ही मुलगी. मुळे कुटुंबीय अत्यंत साधे. परंतु, संस्कारक्षम व धार्मिक. त्यामुळे लहानपणापासूनच सोज्वळपणाचा वारसा प्रभा यांना लाभला. पूर्वाश्रमीची प्रभा मुळे 1985 मध्ये सौ. प्रभा हेंद्रे विवाहबद्ध होऊन फलटणमध्ये आल्या. फलटणच्या श्री. चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांच्याशी तिचा विवाह झाला. सतत उत्साही व कलाकार असलेल्या चंद्रशेखर यांच्यामुळे सौ. प्रभा यांच्या व्यक्तिमत्वाला विशेष झळाळी लाभली. आपापल्या क्षेत्रात दोघेही कलाकार. चंद्रशेखर यांना गायनाचा छंद.
काही नाटकात भूमिकाही करून त्यांनी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला. प्रभाताईंनाही सामाजिक कार्याची आवड. त्यामुळे हे दोन्ही व्यक्तिमत्वे परस्परपूरक ठरली. दोघांचा आपापसातील मेळ वाखाणण्यासारखा. त्यामुळे प्रपंचात सुरळीतपणा आला.
आपली घराची जबाबदारी सांभाळून समाजासाठी वेळ देताना मोठी कसरत होत असते. प्रभाताईंनी सर्वांशी मिळूनमिसळून राहत सर्वांशी सुसंवाद साधत आपल्या कामसाठी संसारातून वेळ काढला. दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्थायीभाव त्यांना समाजसेवेची प्रेरणा देतो. सामाजिक कार्यासाठी अजूनही खूप काही करण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे. म्हणूनच भविष्यात त्या आपल्या कार्यात आघाडीवर राहतील, अशा आशावाद व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्याची आवड असल्याने प्रभाताई लोकांमध्ये मिळूमिसळून राहू लागल्या. वेळप्रसंगी दुसऱ्याच्या मदतीला जाण्याचा स्वभाव व माणसे ओळखण्याची उपजत बुद्धी यामुळे जेमतेम नववीपर्यंत शिकलेल्या प्रभाताई एखाद्या उच्चशिक्षित समाजसेविकेप्रमाणे समाजात सहज व सराईतपणे वावरु लागल्या. शिवणकामात वाकबगार असल्यामुळे साहजिकच महिला वर्ग प्रभा हेंदे यांच्याकडे आकृष्ट झाला. त्यामुळे महिलाच्या प्रश्नांची जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली. महिला सबलीकरणाच्या कामासाठी त्या प्रयत्न करून लागल्या.
कोणतेही काम असो ते समजून घेऊन सराईतपणे करण्यात प्रभाताई यांचा हातखंडा आहे. पतीच्या कामातही प्रभाची मोलाची मदत असते. कोणत्याही गोष्टीचा गर्व नसणे हा प्रभाताई यांचा स्थायीभाव आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही बाबीचा त्यांना हव्यास नसतो. प्रभाताई यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वामुळे राजे गटातर्फे नगरपरिषदेच्या निवडणुकीत उभे राहण्याचा आग्रह झाला. पण प्रभा हेंद्रे यांनी तो निग्रहाने टाळला. समाजाची सेवा करण्यासाठी पक्षात असावे लागत नाही.
पदाशिवायही समाजाची सेवा करता येते, हे प्रभा यांचे तत्व आहे आणि त्या तत्वाला धरुनच त्यांची समाजसेवा आजही सुरुच आहे. संसाराचा गाडा सांभाळत एक गृहिणी म्हणून प्राप्त परिस्थितीत समाधानी राहण्याची कला प्रभाने आत्मसात केली आहे. त्याचबरोबर सामाजिक कामात योगदान देण्यासाठी असणारे त्यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. सामाजिक कार्य करत आपल्या सौरभ व संकेत या मुलांसह पती चंद्रशेखर यांच्यासह प्रभाताई यांनी आपला संसार सुखाचा व समाधानाचा बनवला आहे. स्वतःचा प्रपंच सांभाळून सामाजिक कार्याकडेही लक्ष ठेवणाऱ्या सौ. प्रभा हेंद्रें यांच्यासारख्या महिलांची समाजाला आज गरज आहे, हे मात्र नक्कीच.