शिंदे वासुली (वार्ताहर) – भामाआसखेड प्रकल्पग्रसत शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत एक किमी जलवाहिनेचे काम बंद ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु प्रशासनाने शब्द न पाळता पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले, पालकमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळाले नाही, आमदार दिलीप मोहिते पाटलांनी धरणग्रस्तांवर मागच्या सरकारचे व तुमचे “डील’ झाले होते, मग आताच विरोध का? असे सांगत आगपाखड केली. करोनाचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरले, विविध कारणांमुळे आंदोलन पेटल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.
धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील बहुतेक गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे. अजूनही येथील गावांची गावठाणे विकसीत झाली नाहीत. बुडीत घरे, शेती, झाडे, मंदिरे यांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. 14 पोटबंधारे बांधण्याचे शासनाने आश्वासन दिले होते.
लोकप्रतिनिधीच जबाबदार
आमच्या दुर्दशेला फक्त लोकप्रतिनिधी जबाबदार असून त्यांनीच आमचे पाणी पुणे व पिंपरी-चिंचवडला पळविले आहे, असा आरोप साबळेवाडीतील शेतकऱ्यांनी केला आहे.
तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
आम्ही आमच्या न्यय हक्कासाठी लढतो आहोत पण आम्हाला न्याय देण्यास प्रशासन, सरकार दिरंगाईग व चालढकल करीत असल्याने आम्हाला पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच उरला नसून शासनाने केलेल्या फसवणूकीचा निषेध करीत जो पर्यंत जलवाहिनीचे काम बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.