सणसवाडी (वार्ताहर) – शिरूर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात ग्रामस्थांच्या काटेकोर नियोजनामुळे करोनाचा शिरकाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे एकही बाधित रुग्ण आढळला नाही. मोठ्या औद्योगिक परिसरात करोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. याबद्दल आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले आहे.
सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ जिवाचे रान करीत आहेत. बाजारपेठ, दुकाने, भाजीपाला विक्रेते यांना सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक केले होते. सूचना, दंवडी देऊन जनतेला जागरूक केले होते. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात परप्रांतीयांची उपासमारी होऊ नये, यासाठी भुजबळ बंधूनी दोन महिने प्रतिदिन हजार लोकांना भोजन दिले आहे.
आरएसबी कंपन्यांनीही कामगार व परिसरातील गरजूंना दोन महिने भोजन दिले आहे. कार्यकर्ते व खोली मालकांनीही भाडेकरू व गरजूंना धान्य व भोजन देत बांधिलकी जोपासली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी जाण्यास मदत केली आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, परिचारिका, पोलीस गार्ड, ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी चोख कामगिरी बजावली आहे.