पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने 2014 नंतर शहरात पुन्हा कॉंग्रेसचा शहरातील आमदारकीचा 8 वर्षांचा दुष्काळ संपला असून धंग़ेकरांच्या निमित्ताने शहरात कॉंग्रसला पुन्हा उभारी मिळणार आहे.
त्यातच, कसब्याच्या निकालाने महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेस- शिवसेना आणि भाजप एकत्र लढल्यास भाजपला रोखणे शक्य असल्याचे स्पष्ट झाल्याने पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीची शहरातील गणितेही बदलणार असून आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेची जागा कॉग्रेसच्या वाटयाल असल्याने कसब्यात जायंट किलर ठरालेले धंगेकर कॉंग्रसचे लोकसभेचे उमेदवार ठरू शकतील अशी राजकीय चर्चा रंगली आहे. पुढील वर्षी मार्च ते मे 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, धंगेकर यांचे कसब्याच्या निमित्ताने शहरभर पोहचलेले नाव, शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात दोन मतदारसंघ राष्ट्रवादी कडे तर एक मतदारसंघ आता कॉंग्रेसकडे असल्याने कसब्या प्रमाणेच आता लोकसभा निवडणूकीतही भाजपला महाविकास आघाडीचे कडवे आव्हान असणार आहे. 2004 आणि 2009 मध्ये पुणे लोकसभा कॉंग्रेसच्या ताब्यात होती. तर 2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे यांना तर 2019 मध्ये विद्यमान खासदार गिरिश बापट यांना निवडून देत पुणेकरांनी सलग दोन वेळा खासदारकीची माळ भाजप उमेदवारांच्या गळयात घातली होती.
पुणे लोकसभा मतदारसंघात 2004 आणि 2009 मध्ये खासदार सुरेश कलमाडी विजयी झाले होते. महापालिकेत तसेच विधानसभेतही या दोन्ही निवडणूकांमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या फेररचना आणि त्यानंतर 2014 मध्ये असलेल्या मोदी लाटेमुळे पुण्यातही राजकीय गणिते बदलली होती. त्यातच, मनसेने 2012 मध्ये महापालिका निवडणूकीत मुसंडी मारत थेट विरोधीपक्ष नेतेपदाला गवसणी घातल्याने कॉंग्रेसला तसेच शिवसेनेला मोठा फटका बसला होता. त्यातच, 2014 मध्ये देशभर मोदी लाट असल्याने पुण्यातही राजकीय गणिते फिरली. 2014 मध्ये पुण्यातून लोकसभेसाठी भाजपने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिली तर कॉंग्रेसकडून पुण्यातून स्थानिक उमेदवार न देता विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली. तर मनसेने दिपक पायगुडे यांना उमेदवारी दिली.
त्यात, शिरोळे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत पुण्याताली पुर्ण मतदारसंघ असलेल्या सहा आणि ग्रामिण भागाचा समावेश असल्याने दोन अशा आठही मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले. त्या पाठोपाठ 2012 मध्ये महापालिका निवडणूकीत अवघे 26 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने 2017 मध्ये विक्रमी बहुमत मिळवित तब्बल 100 नगरसेवक निवडून आणले. त्याचा फायदा मे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे उमेदवार गिरिश बापट यांना झाला. त्यांनी विक्रमी मताधिक्याने कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव केला. मात्र, लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा शहरात चित्र बदलेले.
त्यात, वडगावशेरी आणि हडपसर मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत तर कॅटोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदार संघात कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना निसटता पराभव पत्कारावा लागला. तर खडकवासल्यातही राष्टवादीच्या उमेदवाराचा पराभव अवघ्या 1700 मतांनी झाला. त्यामुळे, शहरावरून भाजपची पकड सैल होत असून कसबा पोट निवडणूकीचे त्याची प्रचिती करून दिली आहे.ही धंगेकरांसाठी जमेची बाजू ठरणार आहे. परिणामी अवघ्या वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणूकीतही धंगेकर जायंट किलर ठरतील अशी चर्चा होऊ लागली आहे.