मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शिंदे गटातील अंर्तगत कलह चव्हाट्यावर आला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे सोपवण्यात आलेली संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा लोकसभेसह अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यात शिंदे गटाला बळकटी मिळण्याऐवजी वादच अधिक झाले होते.
राज्यात सध्या शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील वादांची रोजच चर्चा होत आहे. मात्र, सध्या राज्यात चर्चा आहे ती अकोल्यातील शिंदे गटातील गंभीर वादाची. या वादातून एकमेकांवर कमिशनचे गंभीर आरोप, एकमेकांच्या तक्रारी, एका गटाने दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी तोडफोड अन् हल्ल्याच्या प्रयत्नाचा प्रकार घडला.
अकोल्यात बाजोरिया विरुद्ध दोन जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, महानगराध्यक्ष, अश्विन नवलेंसह युवासेना जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी असा वाद आहे. हा पक्षांतर्गत वाद आता शिंदे गटातील नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. बुधवारी (1 मार्च) रात्री शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या गोरक्षण मार्गावरील सहकारनगर भागातल्या घरी तोडफोड झाली आहे. यात सरप यांना धक्काबुक्की झाली. सरप यांच्या तक्रारीनंतर शहरातील खदान पोलिसांत बाजोरिया समर्थक असलेल्या उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेलेंसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. आपल्या घरावरील हल्ल्यामागे माजी आमदार गोपीकिशन बाजोरियाच असल्याचा गंभीर आरोप जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनी केला आहे.