धान्यासह, तेल, डाळीची जादा दराने विक्री : ग्राहकांच्या खिशावर डल्ला
पिंपरी – होलसेल व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करून तो शहराच्या उपनगरांमध्ये विकणाऱ्या रिटेल विक्रेत्यांनी “करोना’मुळे आलेल्या मंदीच्या वातावरणातही नफाखोरीची संधी शोधली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे होलसेल बाजारपेठा बंद होत्या.
संचारबंदीमुळे माल येत नसल्याचे कारण सांगत आणि आपल्यालाही माल महागच मिळाला असल्याचे सांगून उपलब्ध असलेला किराणा माल जादा दराने विक्री करण्याचे प्रकार शहरातील विक्रेत्यांकडून सुरू आहेत.
महागाई दिवसेंदिवस वाढत असतानाच सामान्यांवर करोनाचे संकट आले आहे. विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरुवातीला जनता कर्फ्यु पुकारला. सामान्यांने त्याला चांगला प्रतिसाद दिला. एवढ्यावर हे थांबेल ही अपेक्षा सर्वसामान्यांना होती मात्र तसे झाले नाही. जनता कर्फ्यूनंतर संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. या “लॉकडाऊन’चा गैरफायदा आता जीवनावश्यक वस्तू अन अन्नधान्य विक्रेत्यांनी घेतला आहे. तेल, तूरडाळ, साखर, गहू, तांदूळ, शेंगदाणे आदींच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तब्बल 25 ते 30 टक्के केली असल्याचे वास्तव समोर आले आहे.
किराणा मालच येत नाही, तसेच मोठ्या व्यापाऱ्यांनीच भाव वाढवले असल्याच्या तक्रारी शहरातील किराणा दुकानदारांकडून होत आहे. विशेष म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील सर्वच दुकानांमध्ये गर्दी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र प्रशासनाची तयारी पाहता हा लॉकडाऊन आणखी काही दिवस सुरु राहील अशी चर्चा आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट आहे. अशीच काहीशी भीती किराणा भुसार व्यापाऱ्यांमध्येही आहे.
शहरातील होलसेल विक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे रिटेल विक्रेत्यांना होलसेल दरात माल उपलब्ध होत नाही. तसेच शहरात संचारबंदीची प्रभावी अमंलबजावणी केली जात असल्यामुळे विक्रेते शहरात येण्यास धजावत नाहीत. परिणामी उपलब्ध असलेला माल जादा दराने विकण्याचा सपाटाच किराणा दुकानदारांनी लावला आहे. विशेष म्हणजे या प्रकारावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे.
फरसाण, चुरमुऱ्यांच्या किमतीत वाढ
शहरातील अत्यावश्यक मालाची दुकाने कधीही बंद होतील अशी नागरिकांमध्ये भीती आहे. ही दुकाने बंद झाली अथवा किराणा मालच मिळाला नाही तर खाण्याची सोय व्हावी यासाठी फरसाण, चुरमुरे यांची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेता दुकानदारांनी त्याच्याही किमतीमध्ये वाढ केली आहे. 40 रुपयांना मिळणारे 200 ग्रॅम फरसाण 60 रुपयांना विकले जात आहे. तसेच 60 रुपयांचे 90 रुपयांना विकले जात आहे. चुरमुऱ्याच्या किमतीमध्येही किलोमागे 5 ते 8 रुपये वाढविण्यात आले आहेत.
दाद कुणाकडे मागायची
किराणा मालाची जादा दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्राहक संबंधित विक्रेत्यांकडे विचारणा करतात. मात्र माल मिळत नसल्याचे सांगून घ्यायचा असेल तर घ्या असा सल्ला विक्रेते देतात. पर्याय नसल्याने ग्राहकांना विक्रेते सांगतील त्या दरामध्ये किराणा घ्यावा लागत आहे. या प्रकाराबाबत दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
व्यसनासाठी मोजताहेत जादा किंमत
“लॉकडाऊन’मध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूच उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु तंबाकू, गुटखा आणि सिगारेट देखील सर्रास विकले जात आहे. व्यसनी नागरिकांसाठी सध्या व्यसनासाठी “एमआरपी’पेक्षा खूप अधिक किंमत मोजावी लागत आहे. 50 ते 60 टक्के अधिक किंमत मोजून लोक आपली “तल्लफ’ पूर्ण करत आहेत.