नवी दिल्ली : डॉक्टरांना किमान सहा वेळा वाटलं की आता सारं संपलं… पण त्या वृध्द दाम्पत्यानं हार मानली नाही… अखेर 93 वर्षीय थॉमस आणि 88 वर्षीय मरीअम्मा कोरोनामुक्त झाले….कोरोनामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण असताना केरळमधील एका बातमीने आशेचा एक नवा दीप लावला आहे.
या वृध्द दामप्त्यांच्या आव्हांनाचा पाढा येथेच थांबत नाही… तर उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तर मरिअम्मा यांना बॅक्टेरीयाचा संसर्ग झाला. त्यांची सेवा करणाऱ्या परिचारिकेला कोरोनाची बाधा झाली. या सर्व अडथळ्यांवर आस्मानी संकटावर मात करत हे दाम्पत्य पठाणंतिठ्ठा येथील आपल्या घरी परतण्यास सज्ज झाले आहे. त्यांचा मुलगा, नातू आणि सुनेचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांनाही घरी सोडण्यात येत आहे.
या कुटुंबाशी या दिवसांत निर्माण झालेल्या अनोख्या आपुलकीच्या धाग्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही दोन आसवं तराळली. इटलीहून परतलेल्या त्यांच्या मुळामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. या वृध्द दाम्पत्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहा मार्च रोजी पठाणंतिठ्ठा येथील सरकारी रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.
या वृध्द दाम्पत्यांला मधुमेह, रक्तदाब आणि वयामुळे निर्माण होणार आजार या साऱ्याचा विचार करून त्यांच्यावर उपचार घेण्यात येत होते. मात्र थॉमस यांना असणारा हृदयविकार आणि छातीतील वेदना यामुळे हे आव्हान अधिक खडतर बनले होते, डॉक्टर आपला अनुभव सांगत होते.
त्या दोघांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. मात्र त्यांना एकमेकांपासून वेगळे रहायचे नव्हते. मात्र नंतर त्यांची प्रकृती स्थीर झाली. त्यांचा व्हेटिलेटर काढून घेण्यात आला. आता त्यांना सोडण्यात येत आहे, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी या दाम्पत्याला ठणठणीत केल्याबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.
चौकट
कोरोनाबाधित व्यक्तीवर उपचार करताना 60 वर्षावरील व्यक्ती अती धोक्याच्या समजल्या जातात. त्यांचे आयुष्य वाचवणे हे कठीन आव्हान असते. या दाम्पत्याला काहीही होऊ शकले असते. ते वाचले हे त्यांचे नशीब. किमान सहावेळा आम्हाला थॉमस यांना गमावू, असे वाटले होते. पण देवाची त्यांच्यावर कृपा झाली.
डॉ. साजीथ कुमार
संसर्गजन्य आजार विभागप्रमुख