फोंडा घाटाची चढण संपली. डोंगर माथ्यावर येताच आम्ही थोडा विसावा घेतला. कारण आता इथून पुढे आमची गाडी त्या नागमोडी वळणानी खाली खाली उतरत उतरत सागर किनाऱ्या वरच्या निसर्गरम्य कोकण परिसराकडे जाणार होती. तिकडे गाडी चालू झाली आणि इकडे माझे विचार चक्रही. परत परत मला त्या ओळी आठवू लागल्या.
बिन भिंतीची शाळा इथली, अनेक इथले गुरू।
निसर्गाचे धडे गिरवूनी। जीवन सुंदर करू।।
श्रेष्ठ कविराजाची ही बिन भिंतीच्या शाळेची कल्पना खरोखरच अत्यंत सुंदर आहे. आपण जर बारकाईने आणि द्रष्टेपणाने नीट विचार केला तर आपल्या असे नक्कीच लक्षात येईल की खरंच आपल्या सभोवतीचा निसर्ग हाच एक मोठा शिक्षक आहे. त्या निसर्गातले प्रत्येक बारीकसारीक घटक, घटना, घडामोडी या आपल्याला काही ना काही तरी सांगून, शिकवून, बोध करून जाणाऱ्या असतात. निसर्ग हा आपल्याला सुंदर जीवनपाठ देणारा, आपले जीवन सुखमय करणारा आणि आनंदाचं मोरपीस आपल्या गालावरून फिरवणारा जादूगार आहे.
इथे फक्त हवी ती द्रष्टी नजर आणि गुण ग्राहकता. त्याच हेतूने आम्ही मुलांना मुद्दाम कोकणातल्या त्यांच्या आजोळी घेऊन गेलो होतो. तिथे घडलेला एक प्रसंग मला अजून आठवतो. रात्री जेवणानंतर अंगणात गप्पा गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी आजोबांनी नातवंडाना एक कोडे घातले. ते असे की, “”तो उठवतो, पण त्याची हाक ऐकू येत नाही. तो चालतो, पण त्याच्या पावलांचा आवाज येत नाही. तो दिसतो, पण त्याच्या जवळ जाता येत नाही. तो कधी थांबत नाही, सांगा तो कोण?”
खरं तर आजोबांनी मुलांना घातलेलं ते कोड. पण माझं मन मात्र त्या कोड्याचं उत्तर काय असेल? याचा विचार करत होतं आणि त्या विचारातच माझी मलाच कधी झोप लागली ते कळलच नाही. सकाळी मात्र मला जाग आली ती ॐ मित्राय नम:। ॐ सविता सूर्य नारायणाय नम:। ॐ आदित्याय नम:। ॐ भास्कराय नम:। ह्या नाम मंत्राच्या श्रवणानं. मी खिडकीतून बाहेरच्या अंगणात पाहिले तर आजोबा आणि त्यांच्या सोबत ती नातवंडे, त्या एकेका नावाबरोबर आजोबांचे पाहून सूर्य नमस्कार घालण्याचा उपक्रम चालला होता. ते समोरचे दृष्य पाहिले आणि मला रात्री आजोबांनी घातलेल्या त्या कोड्याचे अचूक उत्तर सापडले. त्याचे उत्तर होते-
पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव।
पहाटेस येसी सारा जागवीत गाव।।