मुंबई : राज्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत आहे. त्यापाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, राज्यात जळगाव जिल्ह्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. करोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर चारपट जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील ३० दिवसांच्या कालावधीत तब्बल ११२ जणांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
देशात करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अर्थात मृत्यूदर २.८ टक्के इतका आहे. तर जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर १२.३ टक्के इतका आहे. मुंबईपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा या चार शहरात ४ जून पर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी महिनाभरापूर्वीच याविषयी धोक्याचा इशारा दिला होता. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा ४२ होता. तर १४ जणांचा मृत्यू झाला होता. केवळ पाच दिवसात १४ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला.
मृतांपैकी ६० जणांचे वय ६० पेक्षा अधिक होत. ४७ जण ५० ते ६० या वयोगटातील होते. तर ५ जण ४० ते ५० वयोगटातील होत्या. या मृत्यूमुळे जिल्ह्याचा मृत्यूदर एका महिन्याच्या काळात देशातील मृत्यूदरापेक्षा चारपट अधिक झाला आहे. राज्य सरकारनं आता प्रत्येक व्यक्तीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी १० सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.