मुंबई : राज्यात मागील २४ तासात तब्बल 23 हजार 179 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातही चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, अमरावती, अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हे आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने मोठे आव्हान ठरणार असल्याचे दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यातही आज कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ पहायला मिळाली. यापूर्वी 16 सप्टेंबर 2020 ला 2 हजार 48 रुग्णांची नोंद झाली होती. तर आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 2 हजार 146 नवे रुग्ण आणि 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात सर्वाधिक बाधित तर ग्रामीण भागातही वाढता प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये अॅक्टिव रुग्णसंख्येनेही 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या 10 हजार 851 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आज एकूण 1335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर 7 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. 442 जणांना (मनपा 357, ग्रामीण 85) घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 52515 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61435 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1368 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7552 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
विदर्भातील नागपूरमध्येही कोरोना संसर्ग वेगाने पसरताना दिसत आहे. आज 3370 नवे कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यात नागपूर शहरात 2668 तर नागपूर ग्रामीणमधील 699 रुग्ण आहेत. नागपूर शहरातील आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद झालीय. दरम्यान, 1216 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर 16 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आज 15000 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यामध्ये पॉझिटिव्ह टक्केवारी 22.5% इतकी जास्त आहे. सध्या 21118 अॅक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबई पाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून कल्याण डोंबिवली क्षेत्रात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 250 ते 400 च्या घरात होती. मात्र, आज सर्वाधिक 593 रूग्ण आढळले आहेत. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने पालिकेने काही निर्बंध लावून दिले आहे. मात्र, नागरिक नियम पाळतानासुद्धा दिसत नाही.