बुलढाणा : मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी इथे पांडुरंग मगर या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षापासून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या शेतात घुसून अज्ञातांनी मधमाशांच्या 125 पेट्यांमध्ये रासायनिक कीटकनाशक टाकलं, यात अडीच कोटी मधमाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. यामुळे मात्र पर्यावरणाची मोठी हानी झाली असून या शेतकऱ्याचही मोठे आर्थिक नुकसानही झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पांडुरंग मगर यांनी मेहकर पोलिसात तक्रार दिली आहे.
देऊळगाव माळी येथील पांडुरंग मगर या युवा शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षापासून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी शेतात जवळपास 125 पेट्यांमध्ये मधमाशा पाळल्या होत्या. त्यांची संख्या जवळपास अडीच कोटी एवढी होती.
मगर यांनी उत्तर प्रदेश ,हिमाचल प्रदेश व बिहार येथून मधमाशांचे बीज आणले होते. या पेट्यांमधील मधमाशा जवळपास परिसरातील तीन किलोमीटर अंतरावरून फुलांमधील मध गोळा करून आणत असत आणि त्यामुळे दरवर्षी मगर यांना या व्यवसायातून दोन टनापर्यंत मध मिळत होते आणि वर्षाला दहा लाख रुपयांचे उत्पन्न होत होते.
परंतु अज्ञात व्यक्तीने या सर्व 125 पेट्यांमध्ये रासायनिक कीटकनाशक टाकल्याने मगर यांच्या शेतातील जवळपास अडीच कोटी मधमाशांचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग मगर यांनी याविषयी सांगताना , मी खादीग्राम एनबीबीचा अधिकृत सदस्य आहे. आम्ही आमचा मध चेतक फार्म्स या नावाने विदेशात पाठवण्याच्या तयारीत आहे. मधविक्रीसाठी आवश्यक सर्व लायसन्स आम्ही काढले आहेत. तसेच मधमाशा पालनासाठी ज्या नोंदणी आवश्यक आहेत त्या सर्व आम्ही पूर्ण केल्या आहेत. प्रशासनाने याची चौकशी करून आम्हाला शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन यावेळी मगर यांनी केले.