गडचिरोली : देशात सरकार कोणाचेही येवो ते सरकार नेहमी तळागाळातील लोकांपर्यंत आम्ही पोहचून त्यांचा विकास करू असे आश्वासन नेहमी देताना आपण पाहतो. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही होताना दिसत नाही तोच समाज कित्तेक वर्ष विकासाची प्रतीक्षा करत झिजत राहतो. तर कधी कधी या दिलेल्या आश्वासनामुळेच काहींचा बळी गेल्याचे आपण पाहिले. असाच एक बळी गडचिरोलीसारख्या महाराष्ट्राच्या अतिशय दुर्गम असणाऱ्या भागात गेल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे मृत्यूनंतरही त्याठिकाणच्या यातना जगासमोर आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे एका 23 वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्याचा मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन गावात नेण्यात आला. या घटनेमुळे गडचिराेलीच्या दुर्गम भागातील आराेग्यसेवेचे वाभाडे निघाले आहेत.
भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील गणेश लामी या तरुणाचा क्षयरोगामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 17 जुलै रोजी गणेशला गंभीर अवस्थेत हेमलकसा येथे भरती करण्यात आले होते. 20 जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण देशात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम चालवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे, वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे, यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कृष्णार येथील क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला. जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग झोप काढत होते का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, गणेशचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे हाल संपले नाहीत. कारण मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचा मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधून गावात आणण्यात आला. हा प्रकार लक्षात येताच प्रशासनाने शववाहिका पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत मृतदेह गावात पोहोचला होता. दरम्यान या प्रकरणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी सांगितले आहे. मात्र असे असले तरी खरा प्रश्न येतो तो म्हणजे खरंच देशात विकास होतोय का ?