बुलढाणा – काही दिवसांनपूर्वी बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर सर्वात भीषण अपघात झाला होता. या अपघातात बसने पेट घेतल्याने आणि डिझेलची टाकी फुटून आग पसरल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या बसमध्ये 32 प्रवासी बसले होते. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे म्हंटले गेले. बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची अतिशय धक्कादायक गोष्ट उघड झाली. अपघातावेळी बसचालकाने मद्यप्राशन करून बस चालवल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले आहे.
मात्र अनेकदा काही बस चालकांच्या सतर्कतेमुळे अपघाताच्या घटना टळतात. याचाच प्रत्यय सप्तश्रुंगी गडाकडे एसटी बसच्या प्रवासादरम्यान आला आहे. मागील आठवड्यात खामगाव आगाराची एसटी बस सप्तश्रुंगी गडाकडे निघाली होती. मात्र वाटेतच बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक अमोल केणेकर व वाहक कमल वाघ यांच्या लक्षात आले. त्यानंतर बसचालकाने केलेले कृत्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
त्याचं झालं असं की, खामगाव वरून सप्तश्रुंगी गडाकडे जाणारी बस मलकापूर येथे आल्यावर बसचे ब्रेक फेल झाले. तेव्हा चालत्या एसटी मधून चालक अमोल केणेकर यांनी बाहेर उडी मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेला मोठा दगड आणून चाकाखाली लावला. त्यामुळे एसटी थांबली आणि बसमधील 37 प्रवाशांचे प्राण वाचले. ही संपूर्ण माहिती चालकाने एसटी स्थानकात व्यवस्थापकास फोन करुन दिली. त्यानंतर या बसचालकाच्या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले.