मुंबई – शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम जनआक्रोश मोर्चा काढणार होते. परंतु, त्याआधीच पोलिसांनी परवानगी नाकारत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी या मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे सांगत नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी करून ते मुख्यमंत्रिपदावर बसले आहे. हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीशी घरोबा केला. मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नसून केवळ पिंजऱ्यात बसून राहतात. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने हिंदुत्त्व सोडले. त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
तसेच, शिवसेना हिंदुत्त्ववादी पक्ष नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्त्व विचारसरणीचे नाही, पदासाठी ते तडजोड करणारे आहेत, असाही टोला नारायण राणे यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, राम कदमांना यांना काही वेळातच पोलिसांनी काही वेळातच सुटका करण्यात आली. यानंतर राम कदम म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो, पालघरमध्ये ज्याप्रकारे साधुंची हत्या झाली. त्या वयोवृद्ध साधुंचा आक्रोश आज देखील हा देश विसरलेला नाही. प्रत्येक आखाड्यात सर्व साधु-महंत आज देखील त्यामुळे संतप्त आहेत, असे त्यांनी सांगितले.